अधिकाऱ्यांची एक चूक सरकारला महागात, ५ कोटींसाठी भरावा लागणार ३०० कोटींचा भुर्दंड

मुंबई: एका कंत्राटदाराला ५ कोटी ७१ लाख रुपयांचे देणे अदा करण्यास नकार देत हे प्रकरण न्यायालयात घेऊन जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांमुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या या आडमुठेपणामुळे आणि बेफिकरीपणामुळे आता संबंधित कंत्राटदाराला ५ कोटीऐवजी जवळपास ३०० कोटी रुपये देण्याचा वेळ राज्य सरकारवर ओढावली आहे. या प्रकारामुळे शिंदे-फडणवीस सरकार खडबडून जागे झाले असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्य सरकारवर आर्थिक भार पडणाऱ्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन लढाई लढायची असल्यास संबंधित खात्याच्या मंत्र्याची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाची सध्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

ऑक्टोबर १९९७ मध्ये राज्य सरकारकडून खरे अँड तारकुंडे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना जोडणाऱ्या पोथरा नदीवरील खंबाडा आणि शिरनाई या ब्रिटीशकालीन पुलांच्या डागडुजीचे कंत्राट देण्यात आले होते. २२६ कोटीचे हे काम कंपनीने ऑक्टोबर १९९८ मध्ये पूर्ण केले होते. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वानुसार पुलाच्या खर्चाची वसुली कंपनीला टोलच्या माध्यमातून करायची होती. परंतु, नंतरच्या काळात स्थानिकांच्या विरोधामुळे हा टोलनाका बंद करावा लागला होता. त्यामुळे २२६ कोटीपैकी उर्वरित पैशांच्या वसुलीसाठी वसुलीसाठी कंपनीने लवादाकडे धाव घेतली. हे प्रकरण लवादाकडे आलं तेव्हा आर. एच. तडवी अध्यक्ष होते. त्यांनी कंत्राटाच्या अटीनुसार ४ मार्च २००४ रोजी लवादाने खरे अँड तारकुंडे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ५ कोटी ७१ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. तसेच त्यामध्ये दिरंगाई झाल्यास २५ टक्के प्रतिमहिना चक्रवाढ पद्धतीने पैसे देण्याचे नमूद केले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवादाचा हा निर्णय मान्य केला नाही व न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे २००४ पासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही नमती भूमिका न घेता आधी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा सर्व स्तरावर न्यायालयीन लढाई लढून हे प्रकरण लावून धरले. या कालावधीत ५ कोटी ७१ लाख आणि त्यावरील चक्रव्याढ पद्धतीचे व्याज मिळून एकूण रक्कम ३०० कोटी ४ लाख ६२ हजारांवर पोहोचली. त्यामुळे आता राज्य सरकारला हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि निविदेत टाकलेल्या चुकीच्या अटींमुळे राज्य सरकारवर ही वेळ ओढावली आहे.

‘फाईलवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शेरा अंतिम समजू नका’

काही दिवसांपूर्वीच सामान्य प्रशासन विभागाने असाच एक महत्त्वाचा आदेश जारी केला होता. आतापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी फाईलवर मारलेले शेरे हा अप्रत्यक्ष आदेश मानला जात होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर निवेदन देणाऱ्याकडून सरकारी अधिकाऱ्याकडे निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी घाई लावली जायची. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारकडून या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता एखाद्या फाईलवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘काम करावे’ असा शेरा दिला तरी त्या निर्णयाची अंमलबजावणी डोळे झाकून केली जाणार नाही. त्याऐवजी सरकारी अधिकारी संबंधित फाईलची पडताळणी करुनच संबंधित काम मार्गी लावतील. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्र्यांनी ‘काम करावे’, ‘निधी मंजूर’ असे काहीही शेरे निवेदनावर लिहिले तरी काम होईलच, असे नाही.

Source link

government contractgovt have to pay 300 crore instead 5 croremaharashtra govtShinde-Fadnavis govtमहाराष्ट्र सरकार कंत्राट ५ कोटीशिंदे फडणवीस सरकार५ कोटीऐवजी ३०० कोटी भरावे लागणार
Comments (0)
Add Comment