तांबे यांनी ही निवडणूक अपक्ष लढविण्याचे ठरविले आहे. सुरवातीला ते भाजपमध्ये जाण्याची किंवा भाजप त्यांना पुरस्कृत करण्याची चर्चा होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे त्यांना पुरोगामी आणि काँग्रेसशी संबंधित संघटनांनी पाठिंबा दिला. काँग्रेसचा मोठा गटही त्यांच्यासोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आहे. भाजपपासून दूर राहिल्याने या संघटना त्यांच्यासोबत उघडपणे आल्या आहेत. त्या जवळच आल्याचे पाहून तांबे यांनीही भाजपकडे उघड पाठिंबा मागितला नाही.
भाजपचा पाठिंबा घेतल्यावर हे गणित बिघडू नये, याची काळजी ते घेत आहेत. आज नगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलतानाही त्यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला काही प्रश्न विचारले आहेत. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार का नाही? त्यांनी कोणालाच उघड पाठिंबा का दिला नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तर दुसरीकडे तांबे हेही भाजपचा पाठिंबा नसल्याचे सांगत आहेत.
शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी मतदान होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत थांबा आणि पाहाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने वेगाने हालचाली केल्या. यासंबंधी प्रवक्ते राम शिंदे यांनी सांगितले की, ‘या मतदारसंघात ज्या उमेदवाराला काँग्रेसची उमेदवारी दिली, ती त्यांनी फेटाळली. त्यामुळे काँग्रेसने बंडखोर उमेदवार आणि त्यांच्या वडिलांवरही निलंबनाची कारवाई केली आहे. हा अपक्ष उमेदवार आमच्या नगर जिल्ह्यातील आहे. आमचा स्थानिक पातळीवरील विषय आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर चर्चा करून पालकमंत्री विखे पाटील आज सायंकाळपर्यंत निर्णय घेतील. त्यानुसार आमच्या नगर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. माझी मुंबईत विखे पाटलांची चर्चा झाली आहे. ते आज सायंकाळपर्यंत निर्णय घेणार आहेत’, असेही शिंदे म्हणाले.
भाजपचा हा निर्णय स्थानिक पातळीवर म्हणजे नगर जिल्ह्यापुरता असेल, असे यातून शिंदे यांनी सूचित केले आहे. मात्र, भाजपचा पाठिंबा जाहीर झाल्यानंतर यापूर्वी पाठिंबा दिलेल्या अन्य संघटनांची काय भूमिका राहील, नगर जिल्ह्यात याचा किती परिणाम होईल, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
भाजपाने पाठिंबा दिला तर तुम्ही घेणार का? यावर त्यांनी थेट बोलण्याचे टाळत ‘या संदर्भात माध्यमांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारावे,’ असे तांबे म्हणाले. पुढे चालून काँग्रेसने निलंबनाची कारवाई मागे घेतली तर आपण काँग्रेस बरोबर जाणार का? असे विचारले असता तांबे म्हणाले की, ‘मी जर तरच्या प्रश्नावर वक्तव्य करणार नाही.’