मुंबईकर गारठले! शनिवारी तापमान १५.२ अंशांपर्यंत, आणखी दोन दिवस थंडीची लाट कायम
मुंबई : आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांच्या भेटीला यंदा थंडी काहीशी उशिरा आली. मात्र, संक्रांतीबरोबर थंडीचीही चाहूल लागली असून ती तिळातिळाने वाढतच आहे. सध्या संपूर्ण मुंबईच थंडीमध्ये लपेटून गेली आहे. कपाटात, माळ्यावर ठेवलेले स्वेटर, शाली, जॅकेट, कानटोप्या बाहेर आल्या आहेत. बोचरे वारे थंडीची सातत्याने जाणीव करून देत आहेत. एरवी सकाळच्यावेळी असणारा गारवा शनिवारी दिवसभर जाणवत होता. शनिवारी सकाळी सांताक्रूझ येथे किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस होते. तर कुलाबा येथे १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आज, रविवारी मुंबईचे तापमान १४, तर उद्या, सोमवारी १३ अंशांपर्यंत खाली जाऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.