राज्यातील अनेक भागात लाखो विद्यार्थी राज्य सेवेची तयारी करीत असतात. त्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना. २०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे तो नियम २०२५ पासून लागू करावा अशी मागणी विद्यार्थी सातत्याने करत होते.
पुण्यातील अलका टॉकीज परिसर गेल्या महिन्याभरापासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गजबजलेला होता. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. विविध माध्यमातून मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्याच्या गटामध्ये फूट पडल्याचे वृत्तही समोर आले. त्यामुळे आता हे आंदोलन पूर्णत्वास जाणार की हे प्रश्न दाबले जाणार अशी शंका निर्माण झाली. सुरुवातीला ही अराजकीय आंदोलने झाली. दरम्यान कॉंग्रेस, युवासेना यांच्या विद्यार्थी संघटना देखील विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरल्या. युवासेनेने यासंदर्भात शहरामध्ये पोस्टर्स लावले. या सर्व घटनांमुळे आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत गेली.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.