सयाजी यांनी आपल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या वजनाइतक्या बिया लावण्याचा निर्धार केला आहे. एका कार्यक्रमात आईबद्दल बोलताना सयाजी म्हणाले, ‘माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. प्रत्येकाला वाटतं त्याची आई खूप जगावी. माझी आई मला आयुष्यात कायम जिवंत राहायला हवीये जीपर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत. मग ती कशी राहील? मी आईला म्हटलं बघ तू काय ५०० वर्ष जगणार नाहीस. मला तू कायम जिवंत राहायला हवीस. मी एक काम करतो तुझ्या वजनाइतक्या देशी झाडांच्या बियांची तुला करतो. एका बाजूला तुला ठेवतो . एका बाजूला बिया ठेवतो आणि तुझ्या वजनाइतक्या बिया महाराष्ट्रात लावतो. म्हणजे मग त्या झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात तू असशील. त्या झाडांच्या फळामध्ये दिसशील, सावलीत असशील आणि कायम राहशील.’
पुढे त्यांनी म्हटलं, ‘झाडं लावायचं मी काही सामाजिक काम करत नाही. मला आवड आहे ती आणि आईला मी वचन दिलंय तुझ्या वजनाएवढ्या बिया लावेन म्हणून मी ते काम करतो. मला वाटतं प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं ऋण फेडायचं असेल तर माता आणि धरतीमाता यांच्याइतकी मोठी गोष्ट जगात नाही. तेवढं आपण सांभाळलं तर बस आहे. आपण खूप मोठे झालो. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सयाजी यांनी ‘सहयाद्री देवराई’च्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील अनेक माळरानांवर झाडं फुलवली आहेत आणि ती जगवलीही आहेत.