शैलेश लोढा यांनी कष्टाचे पैसे, मानधन मिळत नसल्याचं म्हणत निर्मात्यांवर आरोप केले. यानंतर एकच चर्चा सुरू झाली. यानंतर आता तारक मेहता ता उल्टा चष्माच्या निर्मात्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. मालिकेचे प्रोजेक्ट हेड असेलल्या सुहेल रामणी यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले ‘तारक मेहता’चे प्रोजेक्ट हेड?
शैलेश लोढा यांच्या काही कागदपत्रांवर सह्या घ्यायच्या आहेत. त्या सह्या करून तुमचं पेमेंट घेऊन जा, असं त्यांना अनेकदा सांगण्यात आलं होतं. परंतु ते आलेच नाहीत. जेव्हा तुम्ही कोणतीही कंपनी किंवा शो सोडता तेव्हा नेहमी एक प्रक्रिया असते, ज्याचं पालन करणं आणि पूर्ण करणं आवश्यक असतं. कलाकार, असो वा कर्मचारी किंवा एखादा टेक्निशियन या सगळ्यांना हे करणं भाग असतं. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतीच कंपनी तुमची थकबाकी देऊ शकत नाही,असं म्हणत सुहेल रामणी यांनी शैलेश लोढा यांच्या आरोंवर उत्तर दिलं आहे.
रामणी पुढं म्हणाले की, म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला एक प्रतिष्ठा आहे. कंपनीनं कोणाचंही एका दिवसाचं मानधन थकवलं नाही. असं काही असतं तर कोणत्याच कलाकारानं आमच्यासोबत काम केलं नसतं. पण मालिकेतलेच कलाकार जेव्हा अशा पद्धतीनं वागतात तेव्हा खूप वाईट वाटतं. डेलीसोप करणाऱ्या कलाकारांनीही काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात.TMKOC साठी टीम दिवसरात्र मेहनत करत असते, असंही त्यांनी पुढं म्हटलंय.