डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी कायम आहेत. ऑनलाइन मूल्यमापनात शून्य गुण प्राप्त झाले. २०२२ सत्राचे निकाल ही तीन वेळा बदलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. संघटनांनी या प्रकरणात थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केल्या आहेत. निकालाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा, निकालाच्या वेळापत्रकात बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. निकालातील त्रुटींबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील दहापेक्षा अधिक महाविद्यालयांनी विद्यापीठाचे संलग्नीकरण स्वीकारले. विविध सत्रातील पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतात. विद्यापीठ प्रशासनाच्या हलगर्जी आणि अक्षम्य निष्काळजी पणामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. अनेकवेळा प्रशासन, कुलगुरुंना विविध विद्यार्थी संघटना, पालक विद्यार्थी यांनी विचारणा केली, निवेदने, आंदोलन केले, परंतु कार्यवाही झाली नसल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनाही निवेदन दिल्याचे सांगण्यात येते.
अशा आहेत तक्रारी..
सदोष मूल्यमापनाचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ऑनलाइन मूल्यमापनात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना शून्य गुण प्रदान झाले आहेत आणि त्याबाबाद कुठलाच प्रतिसाद विद्यार्थ्यांना मिळत नाही, असे विद्यार्थ्यांनी म्हटले. हिवाळी -२२ सत्राचे निकाल तीनदा बदलण्यात आले. प्रत्येक वेळेस विद्यार्थाना वेगवेगळा निकाल मिळाला. कुठलीही पूर्वसूचना न देता, सत्रांत परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे निकष बदलण्यात आले. त्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. बरेचसे निकाल अंतिम परीक्षेच्या १२० दिवसा नंतर घोषित झाले. द्वितीय वर्ष अभियांत्रिकी परीक्षेचा ७० दिसानंतर अद्यापही निकाल घोषित झाला नाही. जानेवारी व फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या परीक्षांचेही निकाल अर्धवट घोषित झालेले आहे. ग्रेस गुणांबाबतही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे, परीक्षा नियंत्रक अथवा परीक्षा विभाग या बाबतीत स्पष्टता नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.