बावीस वर्षांनी पुन्हा भरला वर्ग, विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘मविप्र’च्या केटीएचएम महाविद्यालयातून २००१ मध्ये बीकॉम. ची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा याच महाविद्यालयात वर्ग भरला. निमित्त होते या बॅचच्या स्नेहमिलनाचे. दिवसभर महाविद्यालयात येऊन या विद्यार्थ्यांना आठवणींना उजाळा दिला.

नाशिकसह धुळे, मुंबई, पुणे, पालघर, बोईसर, छत्रपती संभाजीनगर, पनवेल अशा विविध ठिकाणांवरून विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते. या सर्वांनी आपण केलेले व्यावसायिक व सामाजिक कार्य सगळ्यांसमोर मांडले. यावेळी नृत्य, गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन काळातील गमती-जमती, गप्पा, शिक्षकांच्या आठवणी जागवत हा स्नेहमेळावा पार पडला.

सर्व माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला यावेळी देणगी देण्यात आली. माजी विद्यार्थी ही महाविद्यालयाची खरी संपत्ती असल्याचे मत यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी व्यक्त केले. नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यलयाला ‘ए प्लस प्लस’ ग्रेड मिळाली असून, माजी विद्यार्थी या श्रेणीमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे यावेळी डॉ. दरेकर म्हणाले.

यावेळी प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित प्रत्येकाच्या स्वभाव व कार्याला अनुसरून चित्रपट गीतांचा फिशपाँड व प्रत्येकाला दिलेली विशिष्ट टॅगलाइन. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी सीए लोकेश पारख व प्रा. प्राजक्ता देशमुख यांनी केले. आभार माजी विद्यार्थी आयकर सह आयुक्त हर्षद आराधी व रणजीता लूनावत यांनी मानले. यावेळी आयोजित नृत्य गायन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना शहा यांनी केले. प्रीती सोनवणे, सीए सुरेखा चांडक, किरण क्षीरसागर, रंजीता लुणावत, अपर्णा वझे, सोनाली लावरकर, सचिन मोटकरी, प्रशांत उशीर, मीतेश छाजेड, कल्पना गडाख या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.

Source link

Career Newscollege alumnieducation newskthm collegenashik collegeकेटीएचएम
Comments (0)
Add Comment