Mumbai University: चार महिन्यानंतरही विद्यार्थ्यांना MA, LLMच्या निकालाची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १२० दिवस उलटूनही अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. मराठी, हिंदी, मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि तृतीय सत्राच्या आणि एलएलएम अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने जानेवारीमध्ये घेतल्या होत्या. यातील काही परीक्षा ८ जानेवारीला संपल्या. विद्यापीठाच्या सर्वच परीक्षांचा निकाल ४५ दिवसांत लागणे अपेक्षित असताना अद्याप या परीक्षांचा निकाल लागलेला नाही.

मुंबई विद्यापीठाच्या चौथ्या सत्राच्या परीक्षा ६ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र अद्याप तिसऱ्या सत्राचे निकाल लागणे बाकी आहे. तसेच एमए तिसऱ्या सत्रात अनुत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्यांचे पूनर्मूल्यांकन आणि पुनर्परीक्षा घ्यावी लागणार आहे. मात्र अजून निकाल न लागल्याने एका महिन्यात या प्रक्रिया पार पडतील की नाही, याबाबत विद्यार्थ्यांना साशंकता वाटत आहे. तसेच पुनर्परीक्षा आणि चौथ्या सत्राची परीक्षा एकाचवेळी आल्यास विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येणार आहे.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या चौथ्या सत्राच्या अंतर्गत चाचणी परीक्षा घेतल्या आहेत. तसेच मराठी विषयाच्या चौथ्या सत्राचे १०० गुणांचे प्रकल्प आणि तोंडी परीक्षा पार पडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी चौथ्या सत्राच्या अंतिम परीक्षेचे अर्जही सादर केले आहेत. या अर्जात पहिल्या तीन सत्रांचा जीपीए स्कोअर विद्यार्थ्यांना नमूद करावा लागतो. मात्र तिसऱ्या सत्राचा निकाल लागला नसल्याने विद्यार्थ्यांना ही जागा रिकामी सोडायला सांगितली आहे.

त्यातून चौथ्या सत्राचे निकाल जाहीर करताना विद्यापीठाने आणखी गोंधळ घालू नये, अशी अपेक्षा एका विद्यार्थीनीने व्यक्त केली आहे. एलएलएम प्रथम सत्राच्या पुनर्परीक्षेचा निकाल अद्याप लागला नाही. या परीक्षेलाही आता चार महिने होतील, असे एका विद्यार्थीनीने सांगितले.

‘नोकरीची संधी दुरावते’

मानसशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर ७ जानेवारीला पार पडला. मात्र अजून निकाल लागला नाही. तृतीय सत्राच्या परीक्षेचा निकाल लागला की विद्यार्थ्यांना नोकरी मिळायला सुरुवात होते. मात्र आम्हाला अद्याप निकाल मिळाला नाही. त्यातून नोकरीसाठी अर्ज करणे शक्य नाही. त्याचवेळी अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा निकाल लागला असल्याने त्यांना नोकऱ्या मिळत आहेत. त्यातून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संधी जाते, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

‘विलंब नित्याचा’

‘विद्यापीठाचे निकाल विलंबाने लागणे हे नित्याचेच झाले आहे. अधिकारी जाणीवपूर्वक निकाल विलंबाने लावत आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता राज्यपाल आणि उच्च शिक्षणमंत्री यांनी यात लक्ष घालावे,’ अशी मागणी माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केली आहे.

Source link

education newsllm resultsma examma resultMaharashtra Timesmumbai universityMumbai University Examएमए निकालएलएलएम निकालनिकालाची प्रतीक्षा
Comments (0)
Add Comment