स्पर्धा परीक्षा देताय? मग विश्वास नांगरे पाटलांचा ‘हा’ कानमंत्र डोक्यात फिट्ट करा..

युपीएससी/ एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमधून नशीब आजमावण्यासाठी आज लाखो तरुण जीवाचे रान करत आहेत. उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी अगदी गावखेड्यापासून ते शहरापर्यंतचे विद्यार्थी झपाटल्या सारखे अभ्यास करत आहेत. दिवसरात्र मेहनत, मोठमोठ्या शिकवण्या ते अगदी काही विद्यार्थी तर या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठत आहेत. त्यामुळे या परीक्षेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

पण याच परीक्षेमुळे अनेकांचे मनोबल खचतानाही दिसत आहे. कारण या परीक्षेतून १ हजार पदांची भरती होणार असेल तर त्यासाठी लाखो विद्यार्थी अर्ज करतात परिणामी बहुसंख्य विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. मग काही विद्यार्थी पुन्हा चिकाटीने तयारीला लागतात तर काही खचून आपला मार्ग बदलतात. अनेकांना या अपयशाचा खूप ताण येतो. अशाच सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही मोलाचे कानमंत्र विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत.

आता विश्वास नांगरे पाटील कोण हे विस्ताराने सांगायची गरज नाही.. महाराष्ट्रातले एक वादळी आणि सक्षम पोलीस अधिकारी. स्पर्धा परीक्षेतून आयपीएस म्हणून राज्याच्या पोलीस दलात नियुक्त झालेले आणि ज्यांचे कर्तृत्व, जिद्द महाराष्ट्रालाच नाही अवघ्या देशाला माहीत आहे असे हे पोलीस अधिकारी. ते सतत स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांचे ‘मन मे है विश्वास..’ हे पुस्तकही बरेच लोकप्रिय आहे. अशाच नांगरे पाटील यांचे काही खास सल्ले जाणून घेऊया..

(वाचा: Career In Political Science: राज्यशास्त्र विषयात पदवी शिक्षण करताय? मग ‘या’आहेत करिअरच्या वाटा आणि संधी..)

विश्वास नांगरे पाटील तरुणांना मार्गदर्शन करताना म्हणतात की,

  • अपयश आले तर तर खचून जाऊ नका, जे झाले ते सोडून द्या, जे हातात आहे त्याचा स्वीकार करा आणि जे भविष्यात घडवायचे आहे त्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न करा.
  • अडचणी येत राहतात पण त्या आयुष्यात नाही तर आपल्या मनात अधिक घर करून असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी अडचणीतून मार्ग आपोआप निघेल.
  • यशस्वी गणिताची सुरूवात ही कायम शुन्यापासून होत असते त्यामुळे अपयश आले म्हणून हतबल व्हायचे नाही.
  • यश मिळविण्यासाठी खूप वेदना सहन कराव्या लागतात. कष्टातून मिळविलेले यश चिरकाल टिकते. त्यामुळे जेवढे मोठे स्वप्न, तेवढेच कष्ट अपार आणि यशही मोठेच मिळत असते.
  • सहजासहजी मिळालेले यश टिकविता येत नाही. त्यामुळे आयुष्यत संघर्ष असायलाच हवा. चटके-फटके बसायलाच हवे तरच यशस्वी होण्यात खरी मजा असते.
  • आपल्या आयुष्यात आलेली संधी ओळखता आली पाहिजे. उद्दिष्ट ठेवून काम केले पाहिजे. एकमेकांविषयी तिरस्काराची भावना न ठेवता काम करता यायला हवे. जास्त जोखमीची कामे स्वीकारली तर यश मिळवायला सोपे जाईल.
  • स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना समोर एक ध्येय, उद्देश ठरवूनच कष्ट घेतले पाहिजेत. त्यासाठी भाषेचा, गावाचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने अभ्यास करायला हवा, तरच ध्येयापर्यंत पोहोचता येईल.
  • अपयशाने खचायचे नाही आणि यशाने हूरळूनही जायचे नाही. जोपर्यत यशस्‍वी होत नाही तोपर्यंत संघर्षाचे मैदान कधीच सोडायचे नाही. जिंकेपर्यंत लढत राहिले की त्या विजयाची दखल काळाला घ्यावीच लागते.

(वाचा: Career In Entrepreneurship: नोकरी सोडून व्यवसायाचा विचार करताय? मग कमी भांडवलात सुरु करा ‘हे’ व्यवसाय..)

Source link

competitive exam preparationcompetitive exam preparation tipssuccess tips in marathiupsc exam guideupsc guidanceupsc mpsc syllabusvishwas nangare patilvishwas nangre patil
Comments (0)
Add Comment