औषध विक्रीच्या दुकान मालकांची कोर्टात धाव; मंत्र्यांकडून सुनावणी होत नसल्याने न्यायालयाची नाराजी

मुंबई: मुंबईतील औषध विक्रीच्या तीन दुकानांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा दिवसांच्या परवाना निलंबनाचा आदेश काढल्यानंतर त्याविरोधात अपिल करूनही दोन महिन्यांहून अधिक काळापासून या विभागाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी सुनावणीच घेतली नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तसेच मंत्री अत्राम यांना लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर तोपर्यंत या तिन्ही दुकानांवर कारवाई करू नये, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
ससूनमधला राडा थांबेना, वैद्यकीय चाचणीसाठी आणलेल्या आरोपीचा धिंगाणा, रुग्णालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
मेसर्स अपना केमिस्ट, श्री महावीर केमिस्ट व मेसर्स अपना मेडिकल एलएलपी या तीन दुकानांच्या मालकांनी परवाना निलंबनाचा आदेश लागू होणार असतानाच्या अखेरच्या क्षणी अॅड. अटलबिहारी दुबे, अॅड. अरविंद तिवारी व अॅड. राहुल मिश्रा यांच्यामार्फत रिट याचिकांद्वारे आपली कैफियत न्यायालयासमोर मांडली. आकस्मिक तपासणीच्या वेळी औषध दुकानाची परवानाधारक व्यक्ती दुकानात उपस्थित नव्हती. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमांतील तरतुदींचे उल्लंघन करत काम सुरू आहे, अशा कारणाखाली अधिकाऱ्यांनी आम्हाला ११ ऑगस्ट २०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली.

त्याबाबत आम्ही १४ ऑगस्ट व ११ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व आक्षेपांना सविस्तर उत्तर दिले. तरीही त्याचा साकल्याने विचार न करता विभागाने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी कारवाईचा आदेश काढून आमचा परवाना ८ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४ या दहा दिवसांच्या कालावधीसाठी निलंबित केला. ही कारवाई चुकीची असल्याने आम्ही ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अर्धन्यायिक अधिकार असलेले अपिलीय प्राधिकरण म्हणून मंत्र्यांकडे अपिल केले. त्यानंतर लवकरात लवकर सुनावणी होण्याकरिता मंत्र्यांना निवेदन देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. कारण आदेशाची अंमलबजावणी होऊन आमच्या व्यवसायाच्या हक्कांवर गदा येण्याची स्थिती निर्माण झाली होती. तरीही सुनावणी झाली नसल्याने नाईलाजाने न्यायालयात यावे लागले’, अशी कैफियत अपना केमिस्टच्या मालकांनी मांडली.

शिंदेंच्या बाजूने निकाल, अजित पवार गट निश्चिंत; ठाकरेंचा निकालानंतर पवारांची धाकधूक वाढली

अशाच प्रकारची कैफियत अन्य दोन दुकानांच्या मालकांनीही मांडली. त्याची न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली. ‘कारवाईच्या आदेशाची अंमलबजावणी होऊन आमच्या परवाना निलंबनाचा कालावधीही संपल्यानंतर आमच्या अपिलावर सुनावणी होऊन तो पर्याय व्यर्थ ठरू नये. अपिलावर आमच्या बाजूने निर्णय झाल्यास आमचे मोठे नुकसान होईल, हे याचिकाकर्त्यांचे म्हणणे रास्त आहे. शस्त्रक्रिया यशस्वी, पण रुग्णाचा मृत्यू… अशा स्वरुपाची स्थिती निर्माण होण्यासाठी वाव असता कामा नये. कारण मुदतीत सुनावणी न झाल्यास व्यावसायिकांच्या व्यवसाय करण्याच्या मूलभूत हक्कांवरच गदा येते’, असे निरीक्षण खंडपीठाने आपल्या निर्णयात नोंदवले.

Source link

Bombay high courtbombay high court displeasureminister dharmarao baba atramधर्मरावबाबा अत्राम बातमीमुंबई उच्च न्यायालय बातमी
Comments (0)
Add Comment