२००पैकी २१४ गुण? तलाठी भरती परीक्षेत मोठा घोळ

Talathi Bharti Exam latest News: राज्यातील तलाठी भरतीच्या निकालात ४८ उमेदवारांना २००पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तर पाच कुटुंबांतील प्रत्येकी दोघे जण गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यामुळे या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने केला आहे. संपूर्ण प्रकाराची चौकशी करून परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या भूमिअभिलेख विभागाने खासगी आयटी कंपनीला चार हजार ४६६ तलाठी पदांच्या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांत राज्यात तीन भागांत ५७ सत्रांत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्यावेळीही पेपरफुटीचे आरोप करण्यात आले होते. परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. यादीत एका विद्यार्थ्याला २००पैकी २१४ गुण मिळाले आहेत. या उमेदवाराला काही दिवसांपूर्वी वनरक्षक पदासाठी झालेल्या परीक्षेत ५४ गुण होते. त्यामुळे निकालाच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होते.

गुणवत्ता यादीचा सखोल अभ्यास केल्यानंतर, पाच कुटुंबांतील प्रत्येकी दोघांना (भावडांना) भरपूर गुण मिळाले आहेत. त्यामुळे हे सर्व गुणवत्ता यादीत आघाडीवर आहेत. एकाच परीक्षेत एकाच वेळी भावंडांना ‘मेरिट’चे गुण मिळत असल्याने, परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून, ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्यात यावी.

तलाठीसह सर्व सरकारी पदभरती परीक्षा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याची मागणी समितीचे राहुल कवठेकर यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही पदभरती परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सामान्यीकरण गुण कार्यपद्धतीचा अवलंब
तलाठी परीक्षेच्या प्रभारी समन्वय अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता नरके म्हणाल्या, ‘५७ सत्रांत विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे ५७ प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळविलेल्या उत्तरांच्या गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. www.mahabhumi.gov.in या वेबसाइटवर गुण प्रसिद्ध करण्यात आले होते.

पाच जानेवारीला सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले ‘नॉर्मलाइज्ड स्कोअर’ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांत वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात.’ गुण सामान्यीकरणाची ही कार्यपद्धती रेल्वे भरती बोर्ड, एसएससी बोर्ड, ‘म्हाडा’मध्ये नोकरभरतीसाठी वापरण्यात आली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तलाठी परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुरावा दिल्यास निश्चित चौकशी केली जाईल. नुसत्या विधानाने चौकशी करता येत नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात पारदर्शकपणे परीक्षा घेण्यात येत असून, कोणत्याही परीक्षेबाबत गैरव्यवहाराचा पुरावा दिल्यास ती रद्द केली जाईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Source link

Talathi bharti examTalathi bharti exam scamTalathi bharti exam scam latest newsvijay wadettiwar latest newsतलाठी भरती परीक्षातलाठी भरती परीक्षा निकाल
Comments (0)
Add Comment