Davos Summit: दावोस परिषदेचे महत्त्व कशामुळे? कोणी केली स्थापना? काय घडते परिषदेत?

मुंबई : दर वर्षी जानेवारी महिना उजाडला, की दावोस परिषदेचे वारे वाहू लागतात. अमुक राज्याने तमुक लाख कोटींची गुंतवणूक आणली, तमक्या जागतिक कंपनीसोबत अमुक करार झाले वगैरे भाषा सुरू होते. जगातील सर्व गुंतवणूकदारांची वारी भक्तिभावाने स्वित्झर्लंडच्या दिशेने निघते. अनेक जागतिक नेते, अर्थमंत्री, अर्थतज्ज्ञ, गुंतवणूकदार कंपन्या, भांडवलदार यांचा ओघ दावोसच्या दिशेने सुरू होतो. अवघ्या ११ हजार लोकवस्तीच्या या छोट्याशा शहरात आंतरराष्ट्रीय पाहुणे येतात, तेव्हा एकच लगीनघाई उडून जाते. यंदाच्या परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोठा लवाजमा गेला आहे. तेव्हा कायम चर्चेत असलेल्या या दावोस शिखर परिषदेचे हे महत्त्व कशामुळे आहे आणि या सगळ्याची सुरुवात कुठून झाली हे यानिमित्ताने जाणून घेणे इष्ट ठरेल.

कोणी केली स्थापना?

जागतिक वित्तीय मंच (डब्ल्यूईएफ) या संस्थेतर्फे ही शिखर परिषद भरविली जाते. दर वर्षी १५ ते १९ जानेवारी याच कालावधीत ही परिषद भरते. जर्मन प्रोफेसर क्लाउस श्क्वाब यांनी ‘डब्ल्यूईएफ’ची स्थापना केली. हे प्रा. श्क्वाब मूळचे अभियांत्रिकी पदवीधर. नंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन या विषयातही पदवी घेतली. प्रा. श्क्वाब १९७२ ते २००३ या काळात जीनिव्हा विद्यापीठात व्यवसाय धोरण विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी १९७१ मध्ये ही संस्था स्थापन केली तेव्हा तिचे नाव ‘युरोपीयन मॅनेजमेंट फोरम’ असे होते. प्रा. श्क्वाब यांनी या संस्थेतर्फे प्रथमच ‘लाभार्थ्यांची भांडवलशाही’ ही संकल्पना आणली. प्रा. श्क्वाब यांच्या म्हणण्यानुसार, या संकल्पनेत कंपन्या केवळ भागधारकांसाठी अल्पमुदतीच्या नफ्याचा विचार करत नाहीत, तर सर्व लाभार्थी घटकांचा, सर्व समाजाचा विचार करून दीर्घकालीन मूल्य निर्माणावर भर देतात. यातूनच पुढे दावोसला भरणाऱ्या परिषदेची कल्पना जन्माला आली. या परिषदेत केवळ व्यापारकर्त्या कंपन्याच नाहीत, तर जगभरातील राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आणि प्रशासनातील अधिकारी एकत्र येऊन जगापुढील वित्तीय आव्हानांची चर्चा करतात.

बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट, ४ किमीपर्यंत हादरे, एका कामगाराचा होरपळून मृत्यू
काय घडते परिषदेत?

सुरुवातीला प्रा. श्क्वाब यांनी युरोपीय कंपन्यांना अमेरिकी कंपन्यांप्रमाणे कामकाज करता यावे, त्यांच्या काही चांगल्या कल्पना युरोपात राबवाव्यात या दृष्टीने परिषदेची आखणी करत होते. मात्र, १९७३ मध्ये अरब-इस्रायल युद्धासह अनेक स्थानिक व जागतिक आव्हानांवर चर्चा झाली आणि त्यातून या परिषदेची एक दिशा ठरत गेली. दोन वर्षांनंतर ‘डब्ल्यूईएफ’ने जगातील आघाडीच्या एक हजार कंपन्यांनी संस्थेचे सभासद व्हावे, अशी कल्पना पुढे आणली. चीनमध्ये आर्थिक क्रांती व्हायच्या काळात, म्हणजे १९७९ मध्ये ‘डब्ल्यूईएफ’ने चीनमधील आर्थिक संस्थांसोबत भागीदारी प्रस्ताव दिले. असे करणारी ती पहिली शासनेतर संस्था ठरली. याच काळात अमेरिकेचे चीनसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अशा गोष्टींमुळे जागतिक वित्तीय क्षेत्रातील पुढारपण ‘डब्ल्यूईएफ’कडे येत गेले. आता या परिषदेत साधारण तीन हजारहून अधिक प्रतिनिधी (यात वर्गणी भरून आलेले व निमंत्रित असे दोन्ही) येतात. यात जगातील प्रमुख नेत्यांसह गुंतवणूकदार, कंपनी मालक, सेलिब्रेटी, पत्रकार असे अनेक जण येतात. पाच दिवसांत सुमारे ५०० सत्रे होतात आणि त्यात जागतिक वित्तीय आव्हाने व तत्संबंधी विषयांवर चर्चा होते.

परिषदेचे महत्त्व का?

गेल्या काही वर्षांत आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे जग जवळ आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला आहे. जागतिक वित्तीय क्षेत्रात ‘डब्ल्यूईएफ’एवढी ताकदवान संस्था दुसरी नसल्याने या परिषदेकडे सर्व जगाचे डोळे लागतात. या परिषदेत जागतिक वित्तीय धोरणाचे सूतोवाच होते किंवा त्याची दिशा कळते. या परिषदेत एरवी तणावपूर्ण वातावरणात भेटी न होऊ शकलेले अनेक राजकीय नेते एकमेकांना सहज भेटू शकतात, असा इतिहास आहे. दक्षिण व उत्तर कोरिया दरम्यान पहिली मंत्रिस्तरीय बैठक दावोसमध्येच झाली. तत्कालीन पूर्व व पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणाची चर्चा दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये दावोसमध्येच सुरू झाली. अगदी ‘जी-२०’ गटाचा जन्मही दावोसमधील चर्चेतून झाला. यंदाची परिषद आज, शुक्रवारी संपेल. त्यातून नक्की काय निष्पन्न झाले, हे त्यानंतर तपशिलात समजू शकेल.

त्यांनी स्वत:च घालवले ‘मातोश्री’चे वलय; मंत्री दादा भुसेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Source link

chief minister eknath shinde davos summitdavos summitwhat is davos summit?दावोस परिषद म्हणजे काय?दावोस शिखर परिषदमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment