काँग्रेस पक्ष केवळ ४४ जागा जिंकून दुहेरी अंकावर आला. २०१९च्या पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांच्या खासदारांची संख्या दुहेरी आकड्यांमध्येच राहिली. दरम्यान, या काळात भाजप पक्ष वाढत गेला आणि प्रादेशिक पक्षही वाढत गेले. आकडे पाहिले तर समजतं, की काँग्रेस पक्षाला भाजपच नव्हे तर प्रादेशिक पक्षही कसे मागे पाडत आहेत.
भाजप विरुद्ध काँग्रेस
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये १७३ जागांवर थेट लढत झाली होती. या जागांवर भाजप किंवा काँग्रेस एकतर जिंकले होते किंवा दुसऱ्या स्थानावर होते. यापैकी ५४ टक्के जागा काँग्रेसने जिंकल्या तर उर्वरित ४६ टक्के जागा भाजपने जिंकल्या. पण २०१४ मध्ये परिस्थिती उलट झाली.
भाजपने थेट लढलेल्या ८८ टक्के जागा जिंकल्या. १८९ थेट जागांपैकी १६६ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ २३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. २०१९ मध्ये हे अंतर मोठं झालं, जेव्हा भाजपने थेट लढलेल्या १९० जागांपैकी ९२ टक्के जागा जिंकल्या.
मतांबद्दल बोलायचं झालं, भाजपच्या मतांची टक्केवारी २००९ मध्ये ४१ टक्क्यांवरुन वाढून २०१४ मध्ये ५०.९ टक्के आणि २०१९ मध्ये ५६.५ टक्के झाली. तर, २००९ आणि २०१४ या काळात काँग्रेसची मतसंख्या कमी झाली. २०१९ मध्ये त्यात काहीशी सुधारणा झाली. मात्र, मतांमध्ये झालेल्या वाढीचा फारसा फायदा झाला नाही.
भाजप विरुद्ध बिगर काँग्रेस : दुहेरी लढत
२००९ मध्ये ५३ जागा अशा होत्या, जिथे थेट लढत भाजप आणि काँग्रेसशिवाय इतर पक्षामध्ये होती. भाजपने इथे प्रत्येक तीन पैकी जवळपास २ जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांचा स्ट्राइक रेट सुधारला आणि गैर-काँग्रेस पक्षांविरुद्ध ७९ टक्के जागा जिंकल्या. पण २०१९ मध्ये भाजप यापैकी बहुतांश प्रादेशिक पक्षांच्या मागे पडला. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत, भाजपने स्थिर वाढ नोंदवली आहे तर बिगर-काँग्रेस पक्षांच्या मतांमध्ये २०१४ मध्ये घट नोंदवली गेली. पण २०१९ मध्ये त्यांना मोठा फायदा झाला.