मटा टॉकटाइम: ‘राजस्थानातील मतदार मोदींच्या बाजूने’- विजया रहाटकर यांचा दावा

राजस्थानात सर्वच्या सर्व २५ जागा जिंकून भाजप ‘हॅट् ट्रिक’ साधणार असे वाटते का?


– राजस्थानात गेल्या अंदाजे दीड ते दोन वर्षांपासून मी येथील मतदारांचे जनजीवन जवळून बघत आहे. विधानसभेसाठी आणि आता लोकसभेसाठी काम करताना अनेक गोष्टी मला जाणवल्या. हे राज्य तसे संवेदनशील आहे आणि येथे जातीची पाळेमुळेही अगदी खोलवर रुजली आहेत. या परिस्थितीमध्ये मतदारांना विकासाचा मुद्दा भावतो आहे, असे जाणवते. मतदारांशी बोलल्यावर त्यांच्या अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास असल्याचे जाणवते. गेल्या दोन लोकसभांप्रमाणे यंदाही आम्ही जिंकून ‘हॅट् ट्रिक’ नोंदवू असा विश्वास आहे.

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काही भागांत सक्रिय दिसतो. काँग्रेसबद्दल काय सांगाल?

– यंदाच्या लोकसभेमध्ये काँग्रेस कोठेही दिसली नाही. एक महत्त्वाचे राज्य असूनही काँग्रेसचे स्टार प्रचारक येथे फिरकले नाहीत. काँग्रेसकडून देण्यात आलेली तिकीटेही काही जणांनी नाकारली. भारतीय जनता पक्षाकडे ठोस मुद्दे होते. त्या आधारे आम्ही संपूर्ण प्रचार प्रक्रिया राबवली. मात्र, प्रचार आघाडीवरही काँग्रेस मागे असल्याचे चित्र होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तेच दिसले.

बाडमेर, नागौर यांसह काही जागांवर भाजप अडचणीत असल्याची चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगाल?

– भारतीय जनता पक्षाने दोन्ही टप्प्यामध्ये अतिशय विचारपूर्वक प्रचार यंत्रणा राबविली आहे. बाडमेर लोकसभा मतदारसंघात रवींद्रसिंह भाटी याने युवकांना आकर्षित केले आहे आणि युवकांमध्येही त्याची चर्चा आहे, हे मान्य आहेच. मात्र, भाटीकडे कोणतेही ठोस मुद्दे आहेत, असे वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने आधीच मांडलेले विकासाचे मुद्देच तो मांडत आहे. त्याच्या रॅली आणि सभांना होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित होईल, असे वाटत नाही. आमच्यासाठी अडचणीच्या जागांवरही भाजपच विजयी होईल.

यंदाच्या प्रचारात प्रादेशिक मुद्दे कोणते होते?

– नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या मागे आम्ही आहोत. यंदाच्या लोकसभेसाठी राष्ट्रीय मुद्दे प्रचारामध्ये आणले गेले; याशिवाय इथल्या अनेक मतदारसंघात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर आहे. ‘ईआरसीपी’ (इस्टर्न कॅनाल राजस्थान प्रोजेक्ट) ही जलयोजना तातडीने लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि हा मुद्दा प्रचारातही आणला. याशिवाय हरियाणातून काही पाणी घेण्याबाबतही कार्यवाही सुरू झाली. गेहलोतांच्या सरकारच्या काळात पाच वर्षांत शासकीय सेवांसाठी कोणतीही परीक्षा झाली नाही. त्यामुळे युवकांमध्ये असंतोष होता. या परीक्षेत पेपरफुटी होऊन भ्रष्टाचार उघड झाला होता. आता त्यांच्यावर योग्य कारवाई केली जात असून, तरुणांच्या रोजगाराचा मुद्दाही प्रचारामध्ये आम्ही मांडला. यंदा दोन्ही टप्प्यांत भाजप विजयी होईल, यात शंका नाही.

Source link

loksabha election 2024vijaya rahatkar Ahmednagar Lok Sabhaराजस्थान लोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक २०२४विजया रहाटकर
Comments (0)
Add Comment