वृत्तसंस्था, जौनपूर (उत्तर प्रदेश) : विद्यापीठाच्या फार्मसी पदविका परीक्षेत विद्यार्थ्यांनी चक्क ‘श्रीराम’चा आधार घेतला. उत्तरपत्रिकेमध्ये त्यांनी रामनामासह काही क्रिकेटपटूंची नावे लिहिली. विशेष बाब म्हणजे अशा पद्धतीने पेपर लिहिणाऱ्या चार विद्यार्थ्यांना उत्तीर्णदेखील करण्यात आले. या प्रकरणी माहिती अधिकारात माहिती मिळविल्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. दोन प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.उत्तर प्रदेशातील जनपद येथील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात ही घटना घडली. डी. फार्मसी या पदविकेच्या अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत ‘जय श्रीराम’ आणि विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या या क्रिकेटपटूंची नावे लिहिली. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी दिव्यांशू सिंह याने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या माहितीतून ही खळबळजनक बाब उघडकीस आली.
निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादकांना दिलासा; ९९,१५० मॅट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी
डी. फार्मसीच्या प्रथम आणि द्वितीय सत्राच्या काही विद्यार्थ्यांना पेपरमध्ये योग्य उत्तरे लिहिलेली नसतानाही उत्तीर्ण करण्यात आल्याची माहिती दिव्याशूंला मिळाली होती. त्यामुळे तीन ऑगस्ट २०२३ रोजी त्याने विद्यापीठाकडे काही उत्तरपत्रिकांच्या फेरमूल्यांकनाची मागणी केली. वेगवेगळे बारकोड असलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये जय श्रीराम व क्रिकेटपटूंची नावे लिहिल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना ७५ पैकी ४२ गुण म्हणजे ५७ टक्के गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे.
विद्यापीठाकडून ठपका
सदोष उत्तरपत्रिका तपासणीबाबत दिव्यांशूने राजभवनाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर राजभवनाने २१ सप्टेंबर २०२३ रोजी चौकशीचे आदेश दिले. विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशीत दोन प्राध्यापकांना दोषी ठरविण्यात आले. त्यानुसार डॉ. आशुतोष गप्ता आणि डॉ. विनय वर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे, असे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वंदना सिंह यांनी सांगितले.