मटा ग्राउंड रिपोर्ट: यंदा राजघराणे निवडणूक रिंगणातून बाहेर, कोण होणार विजयनगरचा राजा?

अब्दुल वाजेद, विजयनगर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील नऊ सागरी किनाऱ्यांजवळ वसलेल्या शहरांपैकी विजयनगर हे एक शहर. शहराच्या एका बाजूला हनुमानाचे मोठे मंदिर, तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी मंदिर. आंध्र प्रदेशावर राज्य करणाऱ्या पशुपती राजू यांच्या घराण्याने हे शहर वसविले आहे. विजयनगर लोकसभा क्षेत्रात राजघराण्यातील सदस्य निवडून येण्याची परंपरा आहे. मात्र, यावेळी प्रथमच राजघराण्यातील सदस्य निवडणूक रिंगणात नसणार आहे. त्यामुळे यावेळी विजयनगरचा राजा कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विजयनगरला ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहे. १७१६मध्ये पशुपती राजू यांच्या घराण्यातील राजा विजयराम राजू (पहिले) यांनी विजयनगर किल्ल्याची स्थापना केली, असे सांगितले जाते. विजयादशमीच्या दिवशी हा किल्ला तयार करण्यात आला. राजघराण्यातील कुटुंबीयांचे वास्तव्य या भागात आहे. त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. परंपरा आजही कायम आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पशुपती राजघराण्यातील अशोक गजपती राजू हे निवडणूक रिंगणात नाहीत. २०१४मध्ये अशोक गजपती राजू तेलगू देसम पक्षाकडून विजयी झाले होते. २०१९मध्ये मात्र वायएसआर काँग्रेसचे बेलाना चंद्रशेखर यांनी त्यांना पराभूत केले.

२०२४च्या निवडणुकीत १५ उमेदवार उभे आहेत. वायएसआर काँग्रेसने बेलाना चंद्रशेखर यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविले आहे. टीडीपीने केलीसेट्टी अप्पल नायडू यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे बोब्लली श्रीनू मैदानात आहेत. तिरंगी लढतीकडे आंध्र प्रदेशासह तेलंगणचेही लक्ष लागले आहे.
आंध्रात सत्तासंघर्ष नव्हे, तर अस्तित्वाची लढाई; जगनमोहन रेड्डी यंदाही गड राखतील?
विजयनगर लोकसभा मतदारसंघात विजयनगर आणि श्रीकाकुलम हे दोन जिल्हे आहेत. एचेरला, राजम, बोबली, चेपूरयपल्ली, गजपतीनगर, नेल्लीमारला, विजयनगर हे सात विधानसभा मतदारसंघ येतात. यात एचेरला हा श्रीकाकुलम या जिल्ह्याचा एक भाग आहे.

तेलगू देसम पक्षाचे प्रामाणिक आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून श्रीकाकूलम अप्पल नायडू ओळखले जातात. टीडीपी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. नायडू कुटुंब आंध्र प्रदेशातील सर्वांत मोठे एकत्रित कुटुंब असल्याचे सांगितले जाते. त्यांचे निकटवर्तीय जी. नायडू यांनी सांगितले, की नायडू कुटुंबात पाच भाऊ, तीन बहिणी, मुले, सुना, नातवंडे, जावई असा परिवार एकत्र राहतो. २००९च्या लोकसभा निवडणुकीत अप्पल नायडू पराभूत झाले होते. १५ वर्षांनंतर पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकून अप्पल नायडूंचे पुत्र केलीसेट्टी यांना मैदानात उतरविले. तिरंगी लढतीत बेरोजगारी, पाणी, शेतीप्रश्नांचे मुद्दे जोरदार चर्चेत आहेत. मतदारांच्या पसंतीत कोण उतरणार, यापेक्षा यावेळी प्रथमच राजघराण्याविरहित कोणता राजा दिल्ली दरबारात पोहोचणार, याची चर्चा जोरात आहे.

Source link

lok sabha elections 2024vijayanagar electionsvijayanagar lok sabha elections
Comments (0)
Add Comment