इंडिया आघाडीची १ जून रोजी बैठक, मात्र ममता बॅनर्जी गैरहजर राहणार, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

नवी दिल्ली: देश लोकसभा निवडणूकांच्या अंतिम टप्प्यात असताना विरोधकांच्या इंडिया आघाडीतर्फे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात येत्या १ जून रोजी घटक पक्षांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आतापर्यंत झालेल्या विविध टप्प्यांतील निवडणूकांमध्ये आघाडीतील सर्व घटकपक्षांनी बजावलेली कामगिरी तसेच निवडणुकीनंतरच्या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भातील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.१ जून रोजी होणाऱ्या या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील निवडणुकांचे आणि रेमल चक्रीवादळाचे कारण देत अनुपस्थित राहण्याबाबत कळविले आहे. मात्र बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, ओडीसा, झारखंड आणि चंदीगढ ८ राज्यांच्या निवडणुका १ जून रोजी नियोजित असताना याच दिवशी होणाऱ्या बैठकीमागील इंडिया आघाडीची संभाव्य रणनीति काय असू शकते हे जाणून घेऊया.
Pune News : दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; भोसरीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक

केजरीवाल फॅक्टर

१ जून रोजी होणाऱ्या या बैठकीमागे ‘केजरीवाल फॅक्टर’ हा एक महत्वाचा घटक असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले अरविंद केजरीवाल हे न्यायालयाकडून निवडणुकीकरता मिळालेल्या जामीनावर बाहेर आहेत. त्यांचा जामीन हा १ जून रोजी समाप्त होत आहे. तसेच १ जून रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये कुठे आघाडी आहे तर कुठे हे पक्ष वेगळे लढत असल्याची परिस्थिती आहे. नुकताच जामीनाचा कालावधी वाढविण्यासाठी केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

निर्णायक वेळी नव्या सहकाऱ्यांना सोबत घेण्यासंबंधी चर्चा

लोकसभा निवडणुकांचा निकाल हा ४ जून रोजी जाहिर होत आहे. यामध्ये निकालानंतर जर सरकार स्थापन करायची वेळ आल्यास त्यासाठीची पुर्वतयारीसाठी कॉंग्रेसला तयार रहायचे आहे. इंडिया आघाडीध्ये समाविष्ट पक्षांना जर बहुमतासाठी आवश्यक जागा न मिळाल्यास सरकार स्थापन करण्यासाठी नव्या सहकारी घटकपक्षांची गरज भासू शकते, तेव्हा या बैठकीमध्ये या संभाव्य पक्षांना सोबत घेण्याबाबतही चर्चा होऊ शकते.

कॉंग्रेसचे प्रमुख नेतृत्व प्रस्थापित करणे

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतरच इंडिया आघाडीची सुत्रे कॉंग्रेसने आपल्या हातात घेतली होती. आता लोकसभेच्या निवडणूका अंतिम टप्प्यात आल्या असताना सर्व घटकपक्षांना खर्गेंकडून निमंत्रण पाठवत कॉंग्रेसने एकप्रकारे आघाडीची सुत्रेच आपल्या हातामध्ये घेतली आहेत.

आघाडीमधील विस्कळीतपणाच्या प्रतिमेला दुरुस्त करणे

इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून आघाडीतील घटकपक्षांत ताळमेळ दिसत नव्हता. यावरुन सत्ताधारी भाजपकडून विरोधाभास असलेल्या पक्षांनी एकत्र येत आघाडी बनविल्याची टिका केली जात होती. दुसरीकडे केरळमधील डाव्यांनी आघाडीपासून फारकत घेतली. ममता बॅनर्जी यांनीही पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो’ ची भूमिका घेतली आहे. पंजाबमध्ये केजरीवाल तर जम्मू कश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती या स्वतंत्र लढत आहेत. या सर्वांमधून आघाडीमध्ये दिसून येणारा विस्कळीतपणा नाहीसा करुन त्यांना एकत्र आणणे ही रणनीती या बैठकीमागे असू शकते.

Source link

India Aghadi meetingIndia Aghadi meeting newsIndia Aghadi newsइंडिया आघाडी बातमीइंडिया आघाडी बैठकइंडिया आघाडी बैठक बातमी
Comments (0)
Add Comment