थांबण्याची गरज वाटली नाही! भाजपच्या नोटिशीला बड्या नेत्याचं कडक उत्तर; नड्डांचंही नाव घेतलं

रांची: झारखंडच्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयंत सिन्हा यांना भारतीय जनता पक्षानं कारणे दाखवा नोटिस बजावली होती. हजारीबागमधून मनीष जैयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुम्ही ना प्रचारात दिसलात, ना संघटनेच्या कामात रस दाखवलात. तुम्ही मतदानही केलं नाहीत, अशा शब्दांत भाजपनं सिन्हा यांच्याबद्दलचे आक्षेप नोंदवले होते. नोटिशीला उत्तर देण्यासाठी सिन्हा यांना २ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. माजी मंत्री असलेल्या सिन्हा यांनी आता पक्षाला नोटिशीला उत्तर दिलं आहे.

झारखंड भाजपचे महामंत्री आणि राज्यसभेचे खासदार आदित्य साहू यांना सिन्हा यांनी २ पानी पत्र लिहिलं आहे. आपल्याला पाठवण्यात आलेल्या पत्राबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. पत्रात त्यांनी २ मार्चला नड्डांसोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला आहे. ‘निवडणुकीत सक्रिय राहणार नसल्याचं मी आधीच नड्डा यांनी सांगितलं होतं. पर्यावरणातील बदलांशी संबंधित विषयांवर काम करण्यासाठी निवडणूक प्रचारापासून दूर राहणार असल्याची कल्पना नड्डा यांना दिलेली होती. माझ्या निर्णयाची घोषणा ट्विट करुन जाहीरपणे केली होती,’ याची आठवण सिन्हा यांनी करुन दिली आहे. मला लिहिण्यात आलेल्या पत्राची चर्चा माध्यमांमध्ये झाली. याबद्दल मला आश्चर्य वाटल्याचा उल्लेखही सिन्हा यांनी लिहिलेल्या पत्रात आहे.
Pune Car Accident: अडीच कोटींची पोर्शे कार अन् ८०० रुपयांचा फोन; कोण विश्वास ठेवेल? कोर्टात काय घडलं?
नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी ट्विट करुन माझा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अनेक जण मला भेटण्यासाठी दिल्लीला आले. निर्णयाचा पुनर्विचार करा, तो मागे घ्या, अशी विनंती त्यांनी मला केली. जनभावना तीव्र होत्या. तो काळ कठिण होता. पण मी राजकीय मर्यादा आणि संयम राखला. मनिष जयस्वाल यांना हजारीबागमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ८ मार्चला त्यांचं अभिनंदन केलं. पक्षाच्या निर्णयाला माझा पाठिंबा हेच त्यातून दिसलं, याकडेही सिन्हा यांनी लक्ष वेधलं.

मी निवडणूक प्रचारात सहभागी व्हायला हवं अशी पक्षाची इच्छा होती, तर मग तुम्ही मला संपर्क करायला हवा होता. २ मार्च २०२४ रोजी मी घोषणा केल्यानंतर झारखंडच्या कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं अथवा आमदार, खासदारानं मला संपर्क केला नाही. मला कोणत्याही कार्यक्रम, रॅली, संघटनेच्या बैठकीचं आमंत्रण दिलं गेलं नाही. बाबुलाल मरांडी यांना मला एखाद्या कार्यक्रमाला बोलवायचं होतं, तर मग त्यांनी मला आमंत्रण द्यायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, अशा शब्दांत सिन्हा यांनी पक्षाच्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर दिलं आहे.
Pune Car Accident: दोघांचा जीव घेणाऱ्या कारबद्दल धक्कादायक माहिती उघड; अगरवालच्या सूचनेचाही तपासातून उलगडा
जयस्वाल यांनी २९ एप्रिलच्या संध्याकाळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संपर्क साधला, आमंत्रण दिलं. तेव्हा मी दिल्लीत होतो. उशिरा आमंत्रण मिळाल्यानं १ मेच्या सकाळी हजारीबागला पोहोचणं शक्य नव्हतं. २ मे रोजी हजारीबागला पोहोचलो. जयस्वाल यांच्या भेटीसाठी त्यांचं घर गाठलं. मनिष तिथे नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जयस्वाल यांच्याशी संपर्क झाला नाही, असा घटनाक्रम सिन्हा यांनी पत्रात मांडला आहे.

वैयक्तिक कारणांमुळे १० मे रोजी परदेशी गेलो. त्याची माहिती लोकसभेच्या अध्यक्षांना दिली होती. पक्ष मला कोणत्याही कार्यक्रमात बोलावत नव्हता. त्यामुळे इथे थांबण्याची गरज मला वाटली नाही. परदेशात जाण्याआधी मी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केलं. त्यामुळे मताधिकाराचा वापर केला नाही, असा आरोप करणं चुकीचं ठरेल. मी २५ वर्षांपासून पक्षासोबत आहे. प्रत्येक जबाबदारी पेलली आहे. निष्ठेनं पक्षाची साथ दिली आहे. त्यामुळे तुम्ही पत्र सार्वजनिक करणं चुकीचं होतं, असं सिन्हा यांनी पत्रात म्हटलं आहे.

Source link

bjpjayant sinhalok sabha election 2024जयंत सिन्हाभाजपलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment