आपल्यावरील आरोपांना एका दीर्घ पत्रात सविस्तर व क्रमवार उत्तर देताना जयंत सिन्हा यांनी ही नोटीस बजावणारे झारखंड भाजपचे प्रदेश सरचिटणीस आदित्य साहू यांनाही गोत्यात आणल्याचे मानले जाते. ‘तुमचे पत्र मिळाल्याने मला आनंद झाला आणि मला मिळण्याच्या आधी तुम्ही ते माध्यमांमध्येही प्रसिद्ध केले हे जाणून खूप आश्चर्य वाटले’, अशी सुरवात करून सिन्हा यांनी म्हटले की लोकसभा अध्यक्षांना रीतसर कळून काही महत्त्वाच्या वैयक्तिक कामानिमित्त मी १० मे रोजी परदेशात गेलो होते. यावेळी पक्षाने मला प्रचाराचे निमंत्रण दिले नसल्याने तेथे माझी गरज भासली नसावी. पण हजारीबाग सोडण्यापूर्वी मी पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे मतदान केले होते. त्यामुळे मी मतदानाचे कर्तव्य बजावले नाही असा आरोप करणे चुकीचे आहे.
गेल्या १० वर्षात आपल्याला भारताच्या आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचा मान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्ष नेतृत्वाने दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली आहे. यासाठी जे पी नड्डा आणि नेतृत्वाचे आपण आभार मानतो, असेही सिन्हा यांनी म्हटले.
आपल्या मार्चमधील एका ट्विटचा स्क्रीनशॉट देऊन सिन्हा म्हणतात ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी, जागतिक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्रिय निवडणूक प्रचारात फारसा भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही मी तशी विनंती केली होती. वैश्विक हवामानबदल, आर्थिक आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर मी पक्षासोबत आनंदाने काम करत राहीन हेही त्यांना सांगितले होते.’
सिन्हा यांनी पत्रात म्हटले की सोशल मीडियावर केलेल्या त्या घोषणेनंतर हजारीबाग लोकसभेच्या हजारो मतदार आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय हृदयस्पर्शी होत्या. अनेक लोक आपल्याला दिल्लीत भेटायला आले आणि यावर निर्णयावर फेरविचार करून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कायम ठेवण्याची विनंती केली. हा एक कठीण काळ होता, ज्यामध्ये आपण शक्य तितकी राजकीय शिष्टाई आणि संयम राखला आणि मनावर संयम राखला. कोणत्याही निवडणूक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे पक्षाला वाटत असते तर आपल्याशी पक्षनेते नक्कीच संपर्क साधू शकले असते. तथापी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला सभेला किंवा संघटनात्मक बैठकीला मला बोलावले गेले नव्हते. बाबूलाल मरांडी किंवा इतर कार्यकर्त्यांनी तसेही केले नाही असेही सिन्हा यांनी म्हटले.