सत्ता कोणाची येणार?
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. सध्याची स्थिती पाहाता निकाल काय लागेल असा प्रश्न मुलाखतीत प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी केंद्रात सरकार हे भाजप प्रणित एनडीएचे येईल हे निश्चित असल्याचे सांगितले. २०१९ साली जेवढ्या जागा भाजप आणि एनडीएने जिंकल्या आहेत तेवढ्याच जागा कायम राहतील. एखाद्या वेळेस त्यापेक्षा थोड्या जास्त जागाही जिंकतील. त्यामुळे भाजप केंद्रात सरकार बनवणार हे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
‘इंडिया’ आघाडी हवी तशी तयार झाली नाही
इंडिया आघाडीबद्दल प्रशांत किशोर म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडी अजून चांगली तयार होऊ शकली असती. ही आघाडी बनत असताना कार्यकर्त्यांमध्ये सुरूवातीला उत्साह होता. एक मजबूत विरोधकांची आघाडी होत आहे असा मेसेजही गेला. मात्र या आघाडीकडून पुढे काहीच कार्यक्रम देण्यात आला नाही. जागावाटपही वेळेवर झाले नाही. आघाडी होत होती त्यावेळी काही राज्याच्या निवडणुका होत्या. या निवडणुका आपण जिंकू असे काँग्रेसला वाटत होते. त्यामुळे त्यांनी इंडिया आघाडीकडे तेवढेसे लक्ष दिले नाही. इथेच गडबड झाली. या काळात भाजपने त्या राज्यातल्या निवडणुका तर जिंकल्याच पण जोरदार मुसंडीही मारली. त्यानंतर राम मंदिर आलं. त्यावेळी तर विरोधकांनी हत्यारचं टाकली होती. पण जनतेत नाराजी आहे हे विरोधकांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खुप उशिर झाला होता.”