अचानक दरड कोसळल्याने किल्ले शिवनेरीवर फिरण्यासाठी आलेले पर्यटक काही वेळ गोंधळून गेले होते. किल्ल्यावर ३१ जुलै पर्यंत बंदी असताना देखील हौशी पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी किल्ले, डोंगरदऱ्या, धबधबे याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. बंदी असताना देखील पर्यटक अशा धोकादायक ठिकाणी जातात. यातून अनेकदा त्यांना आपले प्राणास देखील मुकावे लागते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीची तटबंदी असलेला कडा कोसळला आहे. त्यामुळे किल्ले शिवनेरीवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
कड्यावरून दरड सुटल्यानंतर अनेक दगड; तसेच मलबा खाली आला. अनेक दगड पदपथावर विखुरले. काही दगडांच्या माऱ्याने पदपथमार्गावर पुरातत्त्व खात्याकडून बांधण्यात आलेली भक्कम अशी दगडी संरक्षक भिंतही तुटून कठड्याला भगदाड पडले आहे. आता सुरक्षेसाठी तेथे तात्पुरती फांदी लावण्यात आली आहे.
या घटनेसंदर्भात केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे सर्वेक्षक सहायक बाबासाहेब जंगले म्हणाले, ‘याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आले असून, आणखी काही धोकादायक कडे आहेत का, याचे सर्वेक्षण करून योग्य ती उपाययोजना करण्याबाबत खबरदारी घेतली जाईल.’
भूगर्भशास्त्र विभागाला प्रस्ताव
‘लेण्याद्री आणि शिवनेरी ही दोन्ही डोंगरी पर्यटनस्थळे आहेत. महिनाभरापूर्वी लेण्याद्री येथे माकडांच्या हालचालीमुळे दगड पायरीमार्गावर कोसळले होते. त्याचवेळी आम्ही भारतीय भूगर्भशास्त्र विभागाला धोकादायक कड्यांच्या सर्वेक्षणाबाबत पत्र पाठविले आहे. आता शिवनेरीच्या सर्वेक्षणासाठीही कळवत आहोत. सुरक्षेसाठी करायच्या उपाययोजना, त्याबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला कळवून कार्यवाही केली जाईल,’ असे जुन्नर येथील सर्वेक्षक सहायक भारतीय पुरातत्त्व विभागाचे बाबासाहेब जंगले यांनी सांगितले.