या दुर्घटनेत गोरख पोटे यांची पत्नी, आई आणि चार मुलांचे निधन झाले. पोटे एकटेच बचावले होते. माळीण दुर्घटना आणि पुनवर्सन याबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘गावाला पहिल्यासारखे रूप आलेले नाही. शहरासारखी प्रत्येकाची भिंत वेगळी, चूल वेगळी झाली आहे. जुन्या गावात घराला लागून घरे होती. प्रत्येकाच्या सुख, दु:खात गाव सहभागी होत होता. आता घरे काही ठरावीक अंतरावर आहेत. त्यातच अनेक घरे कुलूपबंद आहेत. त्यामुळे गाव रिकामे वाटते.’
‘आता चित्र बदलले’
‘दुर्घटना घडली, त्या वेळी गावात पारावर होतो. त्यामुळे मी आणि वडील वाचलो; पण आई, भाऊ, बहीण आणि बहिणीची तीन मुले मृत्यू पावली. सरकारने आता नवीन गाव वसवले आहे. मात्र, आमचे गावच चांगले होते. नवीन गावात लोकांचा संपर्क कमी झाला आहे. काही कार्यक्रम असेल, तरच लोक एकत्र येतात. जुन्या गावात समाज मंडळाचे ऑफिस होते. तेथे दररोज ग्रामस्थ फेरफटका मारायचे. त्यामुळे संवाद होत होता. आता ते चित्र बदलले आहे,’ अशी भावना मच्छिंद्र दांगट या तरुणाने व्यक्त केली.
पूर पाहायलो गेलो; म्हणून वाचलो
माळीण दुर्घटनेवेळी घराबाहेर असलेले लोक बचावले. त्यात मंगलदास विरणक (५५ वर्षे) यांचा समावेश आहे. त्या दिवशी खूप पाऊस झाला होता. बुब्रा नदीला पूर आला होता. नदीचे पाणी पुलावरून जात होते. ते पाहायला म्हणून घराबाहेर पडलो आणि मागे एका मिनिटात गावावर दरड कोसळली. कोणाला हालचाल करायचीही वेळ मिळाली नाही. या दुर्घटनेत माझी आई, पत्नी आणि मुलाचे निधन झाले. एक मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक होता आणि दोन मुलींचा विवाह झाला असून, त्या सासरी होत्या. आता गावी मी एकटाच असतो.