शनिवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर जवळपास १६ तास बचाव मोहीम सुरु होती. मात्र रविवारी सकाळी जितेंद्र नगरकर यांचा मृतदेह ढिगाऱ्याखाली दबलेल्या अवस्थेत आढळून आला.
शनिवारी सायंकाळी नगरकर खाणीची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्यासह पाच अधिकारी पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यापैकी चौघांना स्वतःला कसेबसे वाचवण्यात यश आले, मात्र जितेंद्र यांचा पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
कुसमुंडा कोळसा खाणीत पुराच्या पाण्यात वाहून गेलेले उपव्यवस्थापक जितेंद्र नगरकर यांचा मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला. एसईसीएल अधिकाऱ्याच्या मृत्यूने छत्तीसगडसह महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे.
सुरक्षेतील त्रुटी या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. जितेंद्र नगरकर यांच्यासह एकूण पाच अधिकारी खाणीच्या आत तपासणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पाण्याचा असा प्रवाह आला की त्याने पाच जणांना विळखा घातला.
कुसमुंडाचे उपव्यवस्थापक जितेंद्र नगरकर वगळता अन्य चार अधिकाऱ्यांनी स्वत:ला वाचवले, मात्र जितेंद्र पाण्यात वाहून गेले. त्यांच्या बचावासाठी बिलासपूरहून एसडीआरएफ टीमला तात्काळ पाचारण करण्यात आले होते, त्यांनी केलेले बचावकार्य केले १६ तास चालले, परंतु रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. माती आणि पाण्याच्या अतिरिक्त दबावामुळे खाणीच्या आत झालेल्या अपघाताने एसईसीएल हादरले आहे.
चंद्रपुरातही कार दुर्घटना
दुसरीकडे, चंद्रपूर जिल्हातील चिमूर तालुक्यात येणाऱ्या जांभुळघाट ते पिंपळगाव मार्गावर रविवारच्या सायंकाळी थरार बघायला मिळाला. पुलावरून पाणी वाहत असताना कार चालकाने नको ते धाडस केलं. पाण्याचा वेग अती असल्याने कार पुरात वाहू लागली. सुदैवाने एका झाडाला ही कार अडकली. कारमध्ये असलेले पाच प्रवासी काच फोडून बाहेर निघाले, त्यामुळे ते बचावले. पिंपळगाव येथून नागपूरला जात असताना ही घटना घडली. या घटनेचे फोटो समाज माध्यमांत व्हायरल झाले आहेत.