शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या?
आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत. आताच मुलीच्या नकाराला चिडून तिच्यावर हल्ला झाल्याची घटना ऐकली. पोलिसांना अशा केसेसमध्ये कुठलाही राजकीय पक्ष अडवणार नाही. सर्व मुलींच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे. निर्भया केस आपण ऐकली होती, पण इथे किती हिंस्रपणा… ज्या मुलाला एवढी विकृती आहे, मग तो कुठल्याही वयाचा का असेना, त्याला आयुष्यभर आतमध्ये ठेवलं पाहिजे, मी तर म्हणेन फाशीची शिक्षाच दिली पाहिजे, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत
मंदिरात पुजारी जर असं करत असतील, मुलींशी लग्न करुन त्यांना फसवून असं करत असतील, तर यांच्यावर पोलिसांची दहशत असली पाहिजे, पोलीस काय करु शकतात, हे या पुरुषांना कळलं पाहिजे, आणि जोपर्यंत हे कळत नाही, तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत, असा संतापही शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला.
शक्ती कायदा दहा महिन्यांपासून अंमलबजावणीस आला नाही. आमची पंतप्रधानांना विनंती आहे की एका वर्षात तो पास करा आणि अंमलबजावणी होतेय का ते पहा. असे गुन्हे झाले की दोन महिन्यात त्याला फाशीच दिली पाहिजे, हायकोर्ट-सुप्रीम कोर्ट-राष्ट्रपती असा कुठेही वाव नको, शिक्षा झालीच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
मंदिरात झालेली केस लाजिरवाणी आहे. अशा पुरुषांना धर्म नसतो. धर्मनिरपेक्ष अशी तात्काळ शिक्षा व्हावी, तो कुठल्याही धर्माचा असो. लव्ह जिहाद केलं म्हणजे त्याला मारायचं आणि पुजाऱ्याने केलं म्हणून त्याला सोडायचं असं नाही, त्याला तितकीच शिक्षा झाली पाहिजे.