Ashadhi Ekadashi 2024 : संत चोखोबांच्या अभंगातून डोकावतो साजिरा विठ्ठल !

Abhang nirupan saint chokhoba :

महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभलेली असून त्यातील एक संत म्हणजे संत चोखामेळा होय. संत चोखोबांनी लिहिलेल्या अभंगापैकी तीनशे ते साडेतीनशे अभंग उपलब्ध आहेत. चोखोबांच्या अभंगात नाम महिमा, पंढरी महिमा, विठ्ठल वर्णन, देवाशी संवाद, नामदेव महिमा, संत महिमा, त्यांच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारे अभंग, जोहारावर रूपकात्मक केलेले अभंग पहायला मिळतात.

चोखोबांच्या लेखणीतून साकारलेला अभंग म्हणजे,

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं
पुंडलिकापाठीं उभें ठाकें


वारकरी संप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या पांडुरंगाची नगरी ज्या नदीच्या काठावर वसली ती म्हणजे चंद्रभागा नदी. पंढरपूरजवळून वाहताना भीमा नदी चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते म्हणून तिला चंद्रभागा असे म्हणतात. चंद्रभागेचे स्नान करून वारकरी पवित्र होतात. परम सुखाचा आनंद त्या चंद्रभागेच्या तीरावर विठोबा भक्तांना भेटतो असे म्हटले जाते. हरिनामाचा गजर करत लाखोच्या संख्येने वारकरी येत असतात. आधी स्नान चंद्रभागेचे मग भगवंत कथा त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन… एक वेळेस विठ्ठलाचे मूख दर्शन चालेल पण चंद्रभागेचे स्नान झाले पाहिजे. एवढे श्रेष्ठत्व चंद्रभागा नदीचे आहे.

चंद्रभागेचे महत्त्व सांगताना असे सांगतात, एकदा देवांनी तुकाराम महाराजांना विचारले, काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते मागा, त्यावर तुकोबा म्हणाले, देवा मला काहीही नको. चंद्रभागेचे स्नान घडू दे… एवढे वारकरी संप्रदाय आणि चंद्रभागेचे जवळचे नाते आहे. खास करुन एकादशीला चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे यामुळे प्राप्त होणारे अध्यात्मिक सुख शब्दात वर्णन करणे कठीण आहे. म्हणून तर सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं असे म्हटले आहे.
चंद्रभागेत स्नान केल्यानंतर वारकरी आधी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात. वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला आद्य स्थान आहे. म्हणून तर पुंडलिकापाठीं उभें ठाकें असे संत चोखोबा म्हणतात.

साजिरें गोजिरें समचरणीं उभें
भक्ताचिया लोभें विटेवरी

विठोबाचे रुप साजिरे-गोजिरे आहे. प्रत्येक भक्ताला तो आपलासा वाटतो. त्याचा रंग काळा आहे पण मन मात्र खूप मोठं असून लाखो भाविकांच्या इच्छा तो पूर्ण करतो. त्याला कशाचीही आशा, लोभ नाही. भक्त पुंडलिकाने तर चक्क पांडुरंगाला विटेवर उभा राहा अशी आज्ञा केली. एका भक्ताने परमेश्वारला असे सांगणे म्हणजे किती हे धाडस, पण पुंडलिकाने सांगतिल्याप्रमाणे विठोबा विटेवर उभे राहिले आणि कायमचे पंढरपूरवासी झाले. पुंडलिकामुळेच विठोबा पंढरपुरात आले. भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात.

संत चोखामेळा त्या विठोबाचे वर्णन करताना म्हणतात,

कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले
शंख चक्र मिरवले गदापद्म

पंढरपूरमधील विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. विठोबाने मानवाप्रमाणे दोन हात असून त्याने हातात कोणतेही शस्त्र घेतलेले नाही. उलट तो दोन्ही हात कंबरेवर घेवून उभा आहे. कारण हा संसाररूपी भवसागर भक्तांसाठी कमरे एवढा आहे असे त्याचे सांगणे आहे. वारकरी पंढरपुरात मागणं मागण्यासाठी येत नाहीत तर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी, त्याची निष्काम भक्ती हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. विठू माऊलीच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते म्हणूनच तर देव स्वतः भक्ताच्या आदेशाने युगानु युगे कंबरेवर हात ठेवून उभा आहे.

चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी
चंदनाची उटी सर्व अंगी

विठोबाचे वर्णन करताना संत चोखोबा पुढे म्हणतात, चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी
अर्थात विठोबाच्या गळ्यात वैजयंती कंठी घातलेली आहे. त्यामुळे विठ्ठलाचे रुप अधिकच सुंदर दिसते आहे. वैजयंती माळ भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांना प्रिय असून त्याद्वारे श्री विष्णुच्या सर्व प्रकारच्या मंत्रांचा जप करता येतो. आपल्या विठुरायाला चंदनाची उटी खूप आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात विठोबाला त्रास होवू नये म्हणून खास चंदन लावण्याची परंपरा आहे. चंदनाची उटी लावल्यानंतर विठ्ठलाचं रुप खूपच सुंदर दिसतं.

अलंकारापेक्षा चंदन उटीने विठुरायाचे रुप अधिक खुलून येते आणि त्याचे शब्दात वर्णन करणे कठिण आहे. म्हणूनतर चोखोबा चंदनाची उटी सर्व अंगी असे म्हणत विठ्ठलाच्या रुपाचे भरभरून वर्णन करतात.
असा हा पंढरपूरचा विठ्ठल, त्याचं ते साजरं-गोजरं रुप संत चोखाबाच्या अभंगातून पहायला मिळतं.

Source link

Aashdhi Wari 2024devshayani ekadashi 2024Dindisant chokhoba abhangआषाढी एकादशीनिमित्त चोखाबाचा अभंगचंद्रभागेच्या तिरावर चोखामेळांची अभंगवाणीचोखोबांच्या लेखणीतून साकारलेला अभंगवारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान कोण?संत चोखामेळाचे अभंगसाजिरा विठ्ठल
Comments (0)
Add Comment