सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहोचले आहेत. शिवसेना उबाठाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे किल्ल्यावर पोहोचताच ठाकरे आणि राणे समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्या. यावेळी किल्ल्यावर जोरदार राडा झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पोलीस यंत्रणा तिथे काय करतेय? पोलीस तिथे असूनही हा राडा कसकाय झाला? आमचे सर्व नेते तिथे जाणार होते, हे सर्वांना माहिती होतं. या सरकारचं इंटेलिजन्स तोवर काय करतंय? मला वाटतं की गृहमंत्र्यांनी अपील केलं पाहिजे की, सगळ्यांनी शांततेची भूमिका घ्यावी. आमचे नेते जयंत पाटील हे जाणार होते, हे पोलीस यंत्रणाला माहिती नव्हतं का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. आमच्या सर्व नेत्यांची सुरक्षततेची जबाबदारी आता सरकारची आहे. हे अतियश चुकीचं आहे. जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या केसाला धक्काही लागला ना, तर बघा काय होतं ते”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी इशारा दिला आहे.
नेमकं काय घडलं
भाजप खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर आदित्य ठाकरे येतात जोरदार घोषणाबाजी आणि राडा राजकोट किल्ल्यावर पाहायला मिळत आहे. ठाकरे आणि राणे समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणा देण्यात येत आहे. त्यांना इथून हटवा. अन्यथा आम्ही त्यांना ताकद दाखवू, असे इशारे दोन्ही बाजूंनी देण्यात आले आहेत. पोलिसांसोबत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची होताना दिसत आहे.