आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ आणि पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्माण करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचे अनावरण अतुल सावे यांच्या हस्ते म्हाडा मुख्यालयात करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. नवीन आणि मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला गृहसाठा म्हणून प्राप्त झाल्या आहेत.
कोणत्या घरांच्या किंमती कमी
यातील अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी आणि उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले.
यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य अभियंता-२ धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
म्हाडा इमारतींतील रहिवाशांचे २९ ऑगस्टला आंदोलन
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी असलेल्या ३३(७) धोरणाचे फायदे पुनर्रचित म्हाडा इमारतींना मिळत नसल्याने या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. सरकारने अधिसूचना काढूनही त्यात कोणतीच स्पष्टता नसल्याने म्हाडा प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. यामुळे गेली ४० वर्षे जीर्ण इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या रहिवाशांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार सुमारे दीड लाख रहिवासी २८ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.