Fisherman Stuck in Sea : रत्नागिरीच्या समुद्रात अडकलेल्या दोन मच्छिमारांचा मत्सय विभागाने आणि समुद्री तटरक्षक अधिकाऱ्यांनी जीव वाचला. खोल समुद्रात दोन मच्छिमार अडकलेले समजताच तत्परतेने अतिशय सिनेमाप्रमाणे त्यांचे बचावकार्य करण्यात आले.
खवळलेला समुद्र, बोटीत शिरलेले पाणी, समोरच मृत्यूचे भय; कोस्टगार्डच हेलिकॉप्टर ठरले देवदूत
नेमके काय घडले?
नारळी पौर्णिमा झाली असली तरी समुद्रातील वातावरण पोषक नाही समुद्र खवळलेला आहे. रत्नागिरी जवळ पूर्णगड जवळ खवळलेल्या समुद्रात एका बोटीत दोन खलाशी अडकल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोस्टगार्डला माहिती मिळाली तात्काळ कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने दोघांचेही सुखरूप बचावकार्य केले अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. रत्नागिरी येथून सेकंडहॅन्ड बोट खरेदी करून दोन्ही खलाशी कर्नाटकच्या दिशेने जात होते. त्याचवेळी आपत्कालीन प्रसंग त्यांच्यावरती ओढवला होता. मात्र कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले आहेत.
विनोद भागवत नामक मालकाची ही नौका असल्याची माहिती मिळाली आहे. नौका लोखंडी असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. मासेमारी नौकेवर दोन खलाशी होते. पूर्णगड समुद्रात १२ वाव अंतरावर नौका मासेमारी करत होती. यावेळी समुद्रातील वातावरण खराब झाल्याने बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. बोटीत पाणी भरण्यास सुरुवात होताच बोटीतील खलाशांनी तत्काळ बोटीवर चढून मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर मत्स्य विभागाशी संपर्क केला होता. मत्स्य विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीसाठी कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांजवळ संपर्क साधला. आपत्कालीन परिस्थितीत कोस्टगार्ड आणि मत्स्य विभागाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.