बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाचे शहरात पडसाद उमटताना दिसत आहेत. बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पालकांनी आंदोलन केलं असून त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील रिक्षाही बंद आहेत.
सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
“काल राखी पौर्णिमा होती आणि कालच्याच दिवशी ही दु्र्दैवी घटना लक्षात आली. अत्याचार झालेल्या एका बालिकेचं वय तीन वर्ष आठ महिने आहे, तर दुसरीचं साडेसहा वर्ष. जर शाळेतील प्यूनच अशाप्रकारे दुष्कर्म करत असेल तर लेकीबाळी सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतो. एक आई म्हणून आम्हालाही काळजी वाटते, की आमची लेकरं कुठे सुरक्षित आहेत” अशा भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या.
“कल्याणमध्ये सात वर्षांच्या लेकरावर चाकूचे सपासप वार झाल्याचं समोर आलं आहे. आमची मागणी आहे की शाळेच्या बाजूला पोलीस चौकी असावी, पाचशे मीटर अंतरावर पोलिसांची गस्त असावी. सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, विश्वासाने वाढवणाऱ्या मावशांची नेमणूक करावी. लाखो रुपयांची फी घेताना सुरक्षेची जबाबदारी शाळेची असते, हे लक्षात घ्यायला हवं” असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
पालकांचा संताप
जिथे गुन्हा घडला तिथे फाशी द्या, अशी मागणी काही पालकांनी केली आहे. “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, कशासाठी? रेप करण्यासाठी का?” असा डोळ्यात पाणी आणणारा सवाल एका माऊलीने विचारला. “मुलांना कोणाच्या भरोशावर आम्ही शाळेत पाठवायचं? न्याय मिळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही. हे लोकप्रतिनिधी कुठे गेले? आम्हाला ते आज इथे हवे आहेत. पुढच्या मंगळवारी दहीहंडीला सेलिब्रिटी नाचवून गर्दी जमवतील, बॅनरबाजी करतील, ते आम्हाला नको, राजकारण्यांनी आज यावं” अशी मागणी पालकांनी केली.