जय पवार यांना संधी द्यायला पाहिजे किंवा नाही, हे आमच्या जनतेच्या आणि त्या भागातील कार्यकर्ते यांच्या मागणीवर आहे. मी सात आठ वेळा लढलो आहे. त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही. शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल की कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
नेमका काय प्रश्न?
बारामती विधानसभेत तरुण चेहरा किंवा युवा उमेदवार म्हणून जय पवार यांना संधी दिली जाईल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ठीक आहे देऊया, शेवटी लोकशाही आहे. मला तर काही त्यात इंटरेस्ट नाही, मी सात आठ वेळा निवडणुका लढलो आहे, असं अजित पवार म्हणाले.
जनता आणि कार्यकर्त्यांचा तसा कल असेल, तर पार्लमेंटरी बोर्डात त्याचा विचार केला जाईल. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातील कार्यकर्ते जी काही मागणी करतील, ते करायला आम्ही तयार आहोत, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
…तर सुप्रिया सुळेंनाही भेटेन
माझा महाराष्ट्र दौरा सुरु आहे, रक्षाबंधनाच्या दिवशी मी ज्या शहरात असेन, तिथे माझ्या जितक्या बहिणी असतील, त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न असेल, तिथे सुप्रिया असेल, तर तिलाही भेटेन, असं अजितदादा म्हणाले. सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याची चूक झाल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवारांचा पारा चढला. त्याचा इतका पंचनामा तुम्ही लोकांनी चालवला आहे. मला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकारच ठेवलेला नाही, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांसोबत मतभेदाच्या चर्चा
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल अजित पवार यांची खडाजंगी झाल्याचं वृत्त आलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना अजितदादा म्हणाले, की खोट्या बातम्या समोर येतात, आमच्यात कुठलाही वाद नाही, मतभेद नाहीत, आम्ही सगळे एकोप्याने महायुती सरकार चालवत आहोत, आम्ही सगळे एकत्रित काम करत आहोत, विरोधकांकडे दुसरा मुद्दा राहिला नाही, असं कोणी करत असेल, तर नाईलाज आहे मला त्यावर बोलायचं नाही.