सन २०२१मध्ये ३८७ जणांना, २०२२ मध्ये तीन हजार ७१४ जणांना, २०२३मध्ये एक हजार २३१ जणांना, तर २०२४मध्ये (ऑगस्टपर्यंत) एक हजार ३३७ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. याच कालावधीत एकूण २७३ रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. २०२२मध्ये सर्वाधिक, २१५ जणांनी या आजारामुळे प्राण गमावले. २०२१मध्ये यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
या कालावधीत स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या मुंबईमध्ये सर्वाधिक ५०६ इतकी आहे. पुणे येथे २५५, नाशिक १५५, छ.संभाजीनगरमध्ये ३६ रुग्णांची नोंद झाली. नाशिकमध्ये या आजारामुळे १३ जणांचा मृत्यू झाला.
लेप्टोचे मृत्यू घटले
लेप्टोस्पायरोसिस आणि स्क्रबटायफस या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसते. या आजारांमुळे २०२१मध्ये ११, २०२२मध्ये २०, २०२३मध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी २१ ऑगस्टपर्यंत या आजारामुळे दोघांना प्राण गमवावे लागल्याचे माहितीवरून दिसते.
मलेरियामुळे सात, डेंग्यूमुळे ७० मृत्यू
राज्यात मलेरिया, डेंग्यू या आजारांची चिंता कायम आहे. मलेरियामुळे २०२३मध्ये १९, तर २०२४मध्ये ऑगस्टपर्यंत सात जणांना जीव गमावावा लागला. डेंग्यूमुळे या कालावधीत ७० जणांचा प्राण गेला. या कालावधीत चिकगुनियाची रुग्णांची संख्या एक हजार ८७१ असली, तरी एकाही रुग्णाला या आजारामुळे जीव गमावावा लागलेला नाही.
अन्य आजारांची स्थिती
- याच कालावधीमध्ये कॉलरामुळे राज्यात २४ जणांनी जीव गमावला. गॅस्ट्रोमुळे चार, अतिसारामुळे १०, तर काविळीमुळे एकाचा मृत्यू झाला.
- एन्फ्लूएन्झासंदर्भात पुढील उपाययोजना सुरू आहेत
- रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, विनाविलंब उपचार
- खासगी रुग्णालयांनाही उपचारांची मान्यता
- आसेलटॅमिवीर, इतर साधनसामुग्रीचा पुरेसा साठा ठेवणे
- दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यांतील गर्भवती, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना फ्लू प्रतिबंधक लसीकरण
- अन्न व औषध विभागामार्फत सर्व खासगी औषध दुकानांमध्ये आसेलटॅमिवीर उपलब्ध करणे
हिरवे, पिवळे, लाल कार्डांद्वारे गावांत उपाययोजना
वर्षातून दोनवेळा हिरवे, पिवळे व लाल या कार्डांसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येत आहे. जोखीम नसलेल्या गावांना हिरव्या रंगाचे, तसेच मध्यम जोखमीच्या गावांना पिवळ्या रंगाचे कार्ड देण्यात येते. लाल रंगाचे कार्ड देऊन साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतात. साथरोग नियंत्रणासाठी औषधाचा तसेच इतर साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात येतो. पिण्याच्या पाण्याची जिल्हा राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडून नियमित तपासणी करण्यात येते.