येत्या ११ ऑगस्ट रोजी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वड्डेटीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख यांच्यासह काँग्रेसचे काही नेते नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरातील भक्ती लॉन्स येथे नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्याची एकत्र सभा आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभेच्या अनुषंगाने ही महत्वाची सभा असणार आहे.
लोकसभा जिंकली, विधानसभा लक्ष्य
लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्याने काँग्रेसला धक्का बसला होता. अशा परिस्थितीतही काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत गड राखला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशिवाय काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्यांनी नांदेडला हजेरी लावली नव्हती. लोकसभेतील झालेला पराभव अशोक चव्हाण यांच्यासह भाजपासाठी मोठा धक्का होता. या विजयानंतर आता विधानसभेतही जिल्ह्यातील जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे.
अशोक चव्हाण यांची कोंडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून विशेष डावपेच आखले जात आहेत. त्याचवेळी भाजपमधील बडे मासे गळाला लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, यात काँग्रेस पक्ष कितपत यशस्वी होतो, हे आगामी काळात दिसून येणार आहे.
विधानसभेपूर्वी राजकीय भूकंप होण्याची शक्यता
लोकभा निवडणुकीपूर्वी आणि लोकसभा निवडणुकीनंतर नांदेडमध्ये राजकीय भूकंप पहावयास मिळत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री डॉ. माधव पाटील किन्हाळकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यातच आता भाजप पक्षातील काही बडे नेते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक आणि भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. सुहास पाटील हे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे अत्यंत जवळचे आणि कट्टर कार्यकर्ते होते. त्यामुळे चिखलीकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आगामी विधानसभा निवडणूकी पूर्वी राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षात इच्छुकांची गर्दी वाढली
लोकसभेत मिळालेल्या विजयानंतर काँग्रेस पक्षात नवचैतन्य प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभेसाठी पक्षात इच्छुकांची गर्दी वाढली आहे. नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलूर, भोकर, मुखेड, नायगाव, हदगांव हिमायतनगर या मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी पक्षांकडे मागणी देखील केली आहे. जागा वाटपादरम्यान महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.