काय होती चर्चा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी शरद पवार यांच्यावर बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती. मात्र नरेंद्र मोदींनी नेमका पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला. त्यामुळे निवडणुकीत मोठा फटका बसला, असं अजित पवार बोलल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिलं होतं.
अजित पवार यांचा इन्कार
शरद पवारांवर टीका करु नये, असं नरेंद्र मोदींकडे मी काहीही बोललो नाही, बोललो असेन तर दाखवा व्हिडिओ… पुरावा द्या… अशी काही चर्चाच मी केलेली नाही. माझ्या नावाने काहीतरी खपवण्यात आलं. मागेही मी मास्क लावून, रुप बदलून दिल्लीला गेलो होते, असं पिकवण्यात आल. कोणीतरी बाहेर जाऊन काहीतरी सांगतं, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत फटका बसण्याची वेगवेगळी कारणं आहेत, संविधान बदलण्याच्या चर्चांमुळे एससी-एसटी वर्ग बाजूला गेला, कायदा-घटना बदलणार, आरक्षण हटवणार, असा नरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी झाले. अल्पसंख्याक समाज बाजूला गेल्याचा फटका बसला, तरीही महायुती आणि महाविकास आघाडीत अर्ध्या टक्क्याचाच फरक आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.
येवल्यात राष्ट्रवादीची बैठक
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथील कार्यालयात महायुतीची बैठक झाली. या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवाबाबत चर्चा झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातून कशा जास्तीत जास्त जागा आणता येतील, याबाबतही अजित पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.