अमेरिकेला स्थलांतरित श्रमशक्तीची कायमच गरज, वाणिज्य दुतावासात अमेरिकी वक्त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

महाराष्ट्र टाइम्स
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांचा मुद्दा हा एकूण यंत्रणेतील त्रुटी दाखवत असला, तरी या स्थलांतरितांच्या कामाची अमेरिकेला गरज आहे. त्यांच्या श्रमशक्तीवर अमेरिका अवलंबून आहे. या स्थलांतरितांमुळे अमेरिकेची कृषी यंत्रणा अधिक सक्षम बनली आहे, असे अमेरिकेच्या निवडणुकीत सक्रीय असलेल्या दशिका रफिन (डेमोक्रॅट) आणि अॅलिसन विल्यम्स (रिपल्किन) या वक्त्यांनी सांगितले. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलामधील अमेरिकी वाणिज्य दूतावास, दोस्ती हाऊस येथे मुंबई विद्यापीठाच्या तसेच सोफिया महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. अमेरिकेच्या निवडणुकीबद्दल जगभरात उत्सुकता असून या निमित्ताने भारतातील राजकीय क्षेत्रातील उदयोन्मुख अभ्यासकांना या निमित्ताने अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेता आले.

सोशल मीडियावर भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्यांवर टीका होत असल्याचे दिसते. स्थानिक पातळीवरही हा चर्चेचा मुद्दा होतो. मात्र कायदेशीर पद्धतीने अमेरिकेमध्ये येणाऱ्या श्रमशक्तीवर अमेरिका अवलंबून आहे, असे या दोन्ही वक्त्यांनी सांगितले. या दोन्ही वक्त्यांनी अनुक्रमे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पक्षाची भूमिका मांडली.
फॅमिली डॉक्टर संकल्पना मोडीत; ‘मटा संवाद’च्या चर्चासत्रामध्ये तज्ज्ञांचे स्पष्ट मत

विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची

दशिका रफिन या ‘डीएमआर स्ट्रॅटेजीज एलएलसी’ या सल्लागार संस्थेच्या संस्थापक आहेत. या संस्थेने अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये सल्लागार म्हणून काम केले आहे. तर अॅलिसन विल्यम्स या धोरणात्मक नियोजन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्या आर्केन्साचे गव्हर्नर एसा हचिसन यांच्यासाठीही कार्यरत होत्या. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी अमेरिकेमध्ये आता गुन्हेगारीवर नियंत्रण येत असल्याचे समाधान व्यक्त केले. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. यासंदर्भात सुरक्षेला कायमच प्राधान्य दिले जात असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यापीठांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाच्या निवडणुकीमध्ये महागाई, आरोग्यसेवा, प्रजनन हक्क, स्थलांतरण हे मुद्दे महत्त्वाचे असल्याचे भाष्य या वक्त्यांनी केले. यासोबतच निवडणुकीमध्ये होणाऱ्या भाषणाचा आवेश काय आहे यामुळेही फरक पडणार असल्याचे अॅलिसन यांनी सांगितले. संभाषणाचा सूर हा आक्रमक आहे की सकारात्मक योद्ध्याचा आहे याकडेही मतदारांचे लक्ष असल्याचे त्या म्हणाल्या. विविधता, समानता आणि समावेश हे तीन मुद्देही यंदाच्या निवडणुकीत चर्चेत असल्याचे दशिका यांनी सांगितले. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याबद्दलही बोलताना त्यांना विविधता, समानता, समावेश या मुद्द्यांमुळे फायदा मिळाल्याचे म्हटले जाते. त्यामुळे मतदानामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल असे त्या म्हणाल्या.

डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन या दोन्ही पक्षांची काही मुद्द्यांमध्ये विचारसरणी वेगळी असली तरी यंदाच्या निवडणुकीत महिला नेतृत्वामुळे ऊर्जा मिळालेली आहे, असे या दोन्ही वक्त्यांनी आनंदाने मान्य केले. महिला नेतृत्वामुळे पक्षांसाठी येणाऱ्या निधीमध्येही सकारात्मक वाढ झाल्याचे दशिका यांनी सांगितले. या दोन्ही वक्त्यांना उपस्थित विद्यार्थ्यांनी निवडणुकीतील एआयचा वापर, प्रत्येक मताचे मूल्य, पक्षांची युती, सोशल मीडियाचा प्रभाव असे अनेक प्रश्न विचारले आणि या निवडणुकीचे वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

america work cultureamerican experts opinion on workimmigrant workers in Americainternational speakers seminar in Mumbaiअमेरिकेतील वर्क कल्चरअमेरिकेतील स्थलांतरितांच्या हाताला कामजागतिक वक्त्यांशी चर्चासत्रजागतिक स्थलांतरित लोकांचा मुद्दा
Comments (0)
Add Comment