Amol Mitkari Challenge to Jitendra Awhad: निवडणुकीच्या प्रचारदरम्यान एकमेकांवर वार-प्रहार करण्यात आले होते. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला होता. तर निवडणुकीदरम्यान देखील दोघांनी एकमेकांना चॅलेंज दिले होते. आता निकाल समोर आल्यानंतर मिटकरींनी पुन्हा ओपन चॅलेंज दिले आहे.
विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल, असे ओपन चॅलेंज मिटकरींनी दिले होते. मात्र, अजित पवार निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी ८ वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचे, असा प्रहार देखील मिटकरींनी केला होता. यासोबतच अजित पवार जर एक लाखांच्या मतांच्या फरकाने जिंकले किंवा दादा विजयी झाले तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या घरी घरगडी म्हणून राहावे आणि अजित पवार पराभूत झाले तर मी आव्हाडांच्या घरी घरगडी म्हणून कामाला जाईल’, असेही चॅलेंज मिटकरींनी दिले.
आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट म्हणाले की, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल चॅलेंज दिलं होतं. ते आज त्यांनी पूर्ण करावं! बारामती दादांचीच हे आता सिद्ध झाले आहे. प्रमाणपत्र घेतल्यावर सरळ बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा आणि आपले चॅलेंज पूर्ण करावे.
यासोबतच मिटकरींनी अजित पवारच महायुतीचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. आमच्या अपेक्षित जागा निवडून आल्या आहेत. स्ट्राईक रेटवर आम्ही मुख्यमंत्रीपद घेऊ, असेही मिटकरी म्हणाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल ४१ जागा आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळाले आहे.