Devendra Fadnavis: भाजपचा विरोध असताना अजित पवारांनी नवाब मलिक यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली. भाजपचा दबाव झुगारुन देत असल्यानं अजित पवारांच्या विधानं आणि निर्णय चर्चेत राहिले आहेत.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मलिक यांना तुरुंगात जावं लागलं. मग ते जामिनावर बाहेर आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मलिक यांनी अजित पवारांना साथ दिली. त्यावेळीही भाजपनं आक्षेप घेतला होता. पण त्याकडे अजित पवारांनी साफ दुर्लक्ष केलं.
नवाब मलिकांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतलेली होती. पण तरीही अजित पवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या काही मिनिटांत मलिक यांना एबी फॉर्म दिला. याबद्दल भाजपच्या बड्या नेत्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. या विषयावर आमच्यात १०० टक्के मतभेद असल्याचं फडणवीस म्हणाले.
अजित पवारांनी नवाब मलिक, त्यांच्या कन्या सना मलिक यांना तिकीट दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेला हजर नव्हता. याचा अर्थ काय घ्यायचा, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. ‘आम्ही पंतप्रधानांच्या सभा वाटून घेतल्या होत्या. पहिल्या सभेला मी उपस्थित होतो. एका सभेला मुख्यमंत्री, तर अन्य सभेला अजित पवार हजर होते,’ असं फडणवीसांनी सांगितलं.
Devendra Fadnavis: ‘त्या’ मुद्द्यावर अजित पवारांसोबत १०० टक्के मतभेद! मतदानाच्या तोंडावर फडणवीस स्पष्टच बोलले
नवाब मलिक यांच्याबद्दल आमच्यात १०० टक्के फूट आहे. आम्ही त्यांच्यासाठी काम करणार नाही. त्यांचा प्रचार करणार नाही. मलिक यांना तिकीट देऊ नका, असं आम्ही स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे. आम्ही त्याचं काम करु,’ अशा शब्दांत फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.