Sanjay Raut Shrigonda Sabha Highlights From Vidhan Sabha Election: शिवसेना कोंबडीचोरांना मुख्यमंत्री आणि रिक्षाचालकांना मंत्री करण्याची ताकद ठेवते, अशी फटकेबाजी राऊत यांनी श्रीगोंद्यातील सभेतून केली आहे.
श्रीगोंद्यात आज प्रचार सभा झाली. यावेळी उमेदवार अनुराधा नागवडे, साजन पाचपुते यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. त्यानंतर राऊत भाषणासाठी उभे राहिले. त्यावेळी शिवसेनेच्या पद्धतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सभेला नागवडे समर्थक आणि मंचावरील मान्यवर ऐकतच राहिले. हा धागा पकडून राऊत म्हणाले, ‘अनुराधाताई आता याची सवय करा. ही शिवसेना आहे. तुम्ही आणि तुमच्या आधी साजन पाचपुते शिवसेनेत आला आहात. आता तुमचे जे काही व्हायचे ते शिवसेनेतच होईल, दुसरीकडे कोठेही जाऊ नका. एक दीड वर्षापूर्वी साजन पाचपुते शिवसेनेत आले. तेव्हापासून येथे शिवसेना वाढीस लागली. मला आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही खात्री पटली की पाचपुते चांगले काम करणार. आता नागवडे परिवारही आमच्यात सहभागी झाला आहे. खरे तर एक वर्षापूर्वीच मी साजन यांना शब्द दिला होता की तुम्हाला विधानसभा लढवायची आहे. तर ते म्हणाले तयारी करावी लागेल. मात्र आमच्या शिवसेनेत आधी उमेदवारी असते मग तयारी. शिवाय जागा वाटपात फार गंमती असतात. बैठकीला मोठे मोठे नेते असतात. मोठे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीत असतात. आम्ही मोठे नेते नाहीत. आम्ही साधे शिवसैनिक असतो. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची ती शिकवण आहे.’
कालपर्यंत पानटपरीवर बसणाऱ्यांना आम्ही आमदार केले, कोंबडी चोराला मुख्यमंत्री केले, रिक्षाचालकाला मंत्री केले, पुढे तेच मुख्यमंत्री झाले. आमच्याकडे कारखाना नाही. ना कुणाची शाळा, ना सुतगिरणी, दूध डेअर, बँक काहीच नाही. तरीही १८ खासदार आहेत. ६०- ६० आमदार येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन थकले, पण ४५ वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. अशी ही सामान्य मराठी माणसाचे कष्ट आणि त्यागातून तयार झालेली शिवसेना आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींना मला एकदा विचारले होते की तुमचा पक्ष कसा चालतो. त्यांना मी सांगितले की, फटे लेकिन हटे नही, हा मंत्र घेऊन आन्ही चालतो. कितीही संकटे आली तर मागे हटत नाही. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले आहे की सत्ता येते आणि जाते. आपण सत्तेसाठी नाहीत, तर आपण तेथे बसतो तेथून सत्ता सुरू होते. हा मंत्र घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत, असेही राऊत म्हणाले.