Nandi In Shiva Temple: शंभोशंकराच्या मंदिरात गेले की आधी नंदीला नमस्कार करावा लागतो मग आपण महादेवाचे दर्शन घेतो. शंभो महादेवाचे वाहन म्हणून नंदीची ओळख आहे. पण महादेवाच्या मंदिरात नंदी हा कायम मंदिराबाहेर का असतो? नंदी कसा काय महादेवाचे वाहन बनला? हे प्रश्न आपल्याला अनेकदा पडले असतील. चला तर त्याचे उत्तर जाणून घेवूया
Nandi Stories in Puranas:
शंभोशंकराच्या गाभाऱ्याबाहेर किंवा शिवाच्या मूर्तीसमोर कायम आपल्याला नंदी दिसतो. नंदी हे शंभोमहादेवाचं फक्त वाहन नाही तर नंदी शिवाचा परम भक्त आणि सखा आहे. शिवाचे अनेक गण आहेत त्यामध्ये नंदी सर्वोच्च गण मानला जातो.
शंभो महादेवाच्या दर्शनासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा सर्वात आधी नंदीचे दर्शन घ्यावे लागते. मग महादेवाची आराधना केली जाते. भारतीय धार्मिक व्यवस्थेमध्ये पूजनीय मानला जाणारा नंदी कायम गाभाऱ्याबाहेर असतो. या संदर्भात एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे देवाधिदेव महादेव सतत समाधीमध्ये असतात. शंभो महादेवाची समाधी भंग होवू नये म्हणून भक्तांनी आधी नंदीकडे आपले गाऱ्हाणे मांडावे यासाठी ती व्यवस्था करण्यात आली आहे. नंदी हे शंभोमहादेवाचं फक्त वाहन नाही तर नंदी शिवाचा परम भक्त आणि सखा आहे. आपण मंदिरात बघितले असेल, की भक्त महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना करतात. या मागील मान्यता अशी आहे, की नंदी महादेवाच्या गणांमध्ये सर्वात प्रिय आहे. महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना केल्याने ती सरळ महादेवाला पोहोचते अशी समजूत आहे.
नंदीपुराणातील कथा
नंदीपुराणामध्ये महादेवाच्या निरनिराळ्या कथा सांगितल्या जातात. एक कथा आहे शिलाद मुनींची आणि दुसरी समुद्र मंथनाची. आधी आपण समुद्रमंथनाची कथा पाहूया. समुद्रमंथन ही पुराणकाळातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. या समुद्रमंथानाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले होते. ते कोणी तरी प्राशन करायला हवे हा एकमेव मार्ग होता. सगळ्या देवांनी हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार करून त्यांना विषप्राशानाची विनंती केली होती. महादेवांनी हलाहल विष प्यायल्यानंतर त्यांचा गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली. म्हणुन त्यांना नीळकंठ असे म्हटले जाते. महादेव ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांच्या गळ्यात होणाऱ्या जळजळमुळे ते ध्यान करू शकत नव्हते. त्या वेळेस नंदी त्यांच्यासमोर बसून त्यांच्या गळ्याला फुंकर घालु लागला ज्यामुळे महादेवांच्या गळ्यात होणारी जळजळ थांबली. तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणुन नंदी त्यांच्यासमोर फुंकर घालत असतो असतो असे सांगितले जाते.
शिलाद ऋषींची कथा
शिलाद मुनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करत होते. पण एकदा त्यांच्या मनात विचार आला, की यामुळे माझा वंश राहणारच नाही. म्हणुन त्यांनी इंद्रांकडून पुत्र मागितला. परंतु इंद्र त्यांची ही पुत्रप्राप्तीची इच्छा पुर्ण करू शकत नव्हते. इंद्रांनी, शिलाद मुनींना सांगितले, “तुम्ही शंकराची आराधना करा, तुमची इच्छा ते पुर्ण करतील.” शिलाद मुनींनी तपश्चर्या करून भगवान शंकर यांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीची आपली इच्छा सांगितली. “तुमची इच्छा नक्कीच पुर्ण होईल” असं महादेवाने सांगितले. एके दिवशी आपल्या आवारात चालत असतांना त्यांना वाटेत एक नवजाच बाळ सापडलं. जेव्हा ते बाळाजवळ गेले त्यावेळी आकाशवाणी झाली, की “याचे संगोपन करं. हा मुलगा तुझं आयुष्य सुख-समृद्धीने भरून देईल” शिलाद मुनींनी या मुलाचे नाव नंदी ठेवले. या संदर्भात असेही वाचनात आले, की नंदीची निर्मिती यज्ञातून झाली. नंदी हे हिरे माणिक जडित ढालीमध्ये प्रकट झाले असे सांगितले जाते.
नंदी महादेवाचे वाहन कसा बनला?
नंदी हे नंदीनाथ संप्रदायातील प्रमुख गुरु होते असेही मानतात. नंदू या शब्दाचा मूळ अर्थ हा वाढणे, विकसित होणे असा असतो. तर संस्कृतमध्ये याचा अर्थ आनंदी, उत्साही असा आहे. नंदी लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि शिवाचा परमभक्त होता. प्रत्येक विद्येत नंदीने निपुणता मिळवली होती. एकदा शिलादी मुनींच्या आश्रमात दोन साधु आले. शिलाद मुनी आणि नंदीने या दोन्ही साधूंची उत्तम व्यवस्था केली. पुढच्या मार्गाला जाण्यापूर्वी दोन्ही साधुंनी शिलाद मुनींना “शतायुषी भवः” असा आशीर्वाद दिला. परंतु नंदीला आशीर्वाद देतांना ते थोडे कचरले. शिलाद मुनींनी हे ओळखले आणि त्याचे कारण दोन्ही साधूंना विचारले, तर साधु म्हणाले,”आम्ही नंदीला शतायुषी होण्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्याच आयुष्य कमी आहे.’ हे ऐकून शिलाद मुनींना खूप दुःख झाले. नंदीला सगळा प्रकार वडिलांकडून कळला. आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोरजोरात हसत म्हणाला, “मी सुद्धा तुमच्याप्रमाणे शंभोमहादेवाला प्रसन्न करणार आणि अल्पावधीचे विधीलिखीत बदलण्यास सांगेन”. नंदीच्या या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितला. तेव्हा नंदी म्हणाला, “मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायमस्वरूपी.” तेव्हा शंभूमहादेवाने सांगितले, “तु माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्य ही तुच राहशील.” तेव्हा पासुन नंदी बैलाच्या रूपात महादेव जवळच असतो.
गाभाऱ्याबाहेर असलेला नंदी
सद्गुरु नंदीबद्दल सांगताना म्हणतात, “तो गाभाऱ्याबाहेर आहे कारण तो पूर्णतः सावध आहे. सुस्त किंवा निष्क्रिय बसलेला नाहीये. अत्यंत सक्रीय, पूर्णतः जागरूक आणि जीवनाने भरलेला, पण कोणतीच अपेक्षा किंवा मागणी करत नाहीये. तो ध्यान करत बसला आहे. तुम्ही कायम मला हे हवे, मला ते दे असे म्हणत राहता. पण एकदा त्या नंदीप्रमाणे धान्यस्थ बसून पाहा. त्यावेळी तुम्हाला जाणवेल, की तुम्ही त्याचाच एक अविभाज्य घटक आहात. त्या ध्यानधारणेचे प्रतिक म्हणजे नंदी आहे. तो प्रत्येकाला आठवण करून देतो, की तुम्ही माझ्यासारखे बसा. गाभाऱ्यात जाण्यापूर्वी नंदीएवढा साधेपणा, ध्यानस्थपणा तुमच्यात हवा. तरच तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळेल.