Palghar MNS Controversy: पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनसे पालघर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे व त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने वार करत हल्ला केल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर कोयते, तलवार, चाकू अशा धारदार शस्त्रांनी वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. सतीश मोरे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बोईसर येथील शगुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मनसेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचे रूपांतर थेट जीवघेणा हल्ला करण्यात झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन पराभवाची कारणं सांगितली. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली असल्याची देखील माहिती आहे. याचाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.