Prithviraj Chavan Stand Against EVM: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन चकीत करणारे आकडे समोर आले आहेत. महाविकास आघाडीची सपाटून हार झाली आहे. अशातच यंदा राज्यभरातील मतटक्का वाढला आहे. महिलांनी यंदा भरभरुन मतदान केले आहे. तसेच सायंकाळी पाच वाजल्यानंतरही अनेक मतदानकेंद्रांवर रांगा लागल्या होत्या. यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ईव्हीएमविरोधात मास्टरस्ट्रोक टाकला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ५ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. पण विधानसभेत इतका कल बदलेल अशी परिस्थिती दिसत नाही. महाविकास आघाडीसह जनतेला आत्मविश्वास होता की, यावेळी सत्ताबदल होणार. पण आश्चर्य वाटतं की, पक्षफुटीच्या विषयाचा निवडणुकीत काहीच फरक पडला नाही. देशात लोकशाही आहे. निवडणुक फ्री आणि फेअर होणे आवश्यक आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे ईव्हीएमवरुन निवडणूक आयोगाला धारेवर धरले. ते म्हणाले, पंतप्रधानानी निवडणूक आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आम्हाला अंदाज आला होता, काहीतरी गडबड आहे. द्वेष पसरवणारी भाषण मोदी योगी यांच्याकडून करण्यात आली आहेत, त्यांच्यावर आयोगाने कारवाई केली नाही. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे कारवाई करणे. ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही. पण आता फेर पडताळणीचा मला तरी वाटतंय काही फायदा होणार नाही.’ यासोबतच चव्हाणांनी सर्वच्या सर्व VVPATच्या चिठ्या मोजायला हव्यात अशी मागणी देखील केली आहे.
पृथ्वीराज चव्हाणांनी पुढे पुन्हा ईव्हीएम तपासणीच्या मुद्द्यांवर भर दिला. ‘निवडणूक आयोगाने EVM मशीन तपासणीसाठी दिल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय समिती नेमून मशीनची तपासणी केली पाहिजे. ईव्हीएम मशीन हातात भेटले पाहिजे. त्या मशीनमध्ये काही गुप्त कोड आहे का? याचीही तपासणी व्हायला हवी. जागतिक तज्ज्ञांकडून त्याची तपासणी झाली पाहिजे. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
यासोबतच पृथ्वीराज चव्हाणांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे. ‘लोकशाहीचा यांनी मूडदा पाडला आहे,’ असा घणाघाती आरोप चव्हाणांनी केला. तर ते पुढे म्हणाले, ‘निवडणुकीत पोलिसांचा गैरवापर केला गेला आहे. पोलिसांकडून मतदान करून घेतले. निवडणूक आयोग बोलवणार आणि लांबून मशीन दाखवणार आणि विचारणार पुरावा दाखवा. ५ टक्के मतं मोजून काही फायदा होणार नाही. आपल्या हातात मशीन नाही. या मशीनमध्ये काही गुप्त कोड, प्रोगाम फीट केला आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.’ तर ‘यापूर्वी उद्धव ठाकरे यांना भाजपाने फसवले.आता एकनाथ शिंदेंना फसवू नये असे वाटत होते, मात्र तसे चित्र दिसत नाही, असा टोला देखील चव्हाणांनी लगावला.