Godia Shivshai Bus Accident: गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा हा अपघात असून, शुक्रवार काळा दिवस ठरला. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते गोंदिया हा वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर वाहने नेहमी सुसाट धावतात.
हायलाइट्स:
- वेगाने केला प्रवाशांचा घात
- ३५ मिनिटात कापले ३० किमी अंतर
- गोंदिया बस अपघातात मोठी अपडेट
गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा हा अपघात असून, शुक्रवार काळा दिवस ठरला. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते गोंदिया हा वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर वाहने नेहमी सुसाट धावतात. वेगावर नियंत्रण नसते. कोहमारा ते मुंडीपारपर्यंत रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे किमान या ठिकाणी तरी वेग कमी असायला हवा. परंतु, चालक बेभान होऊन या मार्गावरून वाहने सुसाट पळवत असतात. परिणामी, लहान-मोठ्या घटना नेहमीच या मार्गावर घडतात. चालकांचा वाहन चालविण्याचा वेगच प्रवासी आणि सर्वसामान्यांच्या जीवावर उठला आहे. प्रशासकीय यंत्रणाही वाहनचालकांच्या मुसक्या आवळण्यात सपशेल अयशस्वी ठरली आहे. असेच वारंवार घडणाऱ्या घटनांवरून दिसून येते.
आजी-नातवावर उपचार सुरू
या बसमधून एकाच कुटुंबातील चार जण प्रवास करीत होते. यात पती-पत्नीचा मृत्यू झाला तर मुलगा आणि आई थोडक्यात बचावले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील सय्यद कुटुंबीय साकोली येथील नातेवाइकाच्या लग्नात गेले होते. लग्न समारंभ आटोपून ते घरी येत असताना या बसच्या अपघातात अजहर अली सय्यद (वय ५५) व आरिफा अजहर सय्यद (वय ५२) यांचा मृत्यू झाला. तर खतीजाबी बासतअली सय्यद (वय ७०), नातू अल्तास अजहरअली सय्यद (वय १४) हे जखमी झाले. दोघांवर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
मुलीच्या भेटीला निघाले पण…
अपघातातील मृतांमध्ये साकोली तालुक्यातील चांदोरी (उसगाव) येथील रामचंद्र बबलू कनोजे (वय ६५) आणि अंजिरा रामचंद्र कनोजे (वय ६०)या दाम्पत्याचा समावेश आहे. दोघेही डोंगरगड येथे मुलीच्या भेटीसाठी निघाले होते. परंतु, काळाने घात केला आणि अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला.
बस चुकली अन्…
साकोली तालुक्यातील कुंभली येथील प्रकाश हेमने यांची परिस्थिती बेताची असल्याने ते रायपूर येथे मुलासह कंपनीत कामासाठी राहतात. त्यांच्या विवाहित मुलीच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते आठ दिवसांपूर्वी रायपूरवरून कुंभली येथे आले होते. गुरुवारी ते परत रायपूरला जाणार होते. परंतु, त्यांची नागपूर-रायपूर ही बस साकोली येथे चुकल्यामुळे ते परत घरी गेले. मुलांचा फोन आल्यामुळे शुक्रवारी परत ते नागपूर-गोंदिया या शिवशाही बसने गोंदियाला जायला निघाले होते. गोंदियावरून रेल्वेने रायपूरला जाणार होते. तेथे रेल्वे स्टेशनवर त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येणार होता. परंतु, काळाने घात केला.
दोन मृतांची ओळख पटली
अपघातातील दोन मृतकांची ओळख पटली असून दोन्ही मृतक हे भंडारा जिल्ह्यातील लाखनी व साकोली तालुक्यातील आहे. उदाराम खेडकर(वय ७०) रा. राजेगाव मोरगाव, ता. लाखणी व प्रकाश हेमने (वय ५५) रा. कुंभली ता. साकोली अशी मृतकांची नावे आहेत. या अपघातातील ११ मृतकांपैकी सहा हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक व गोंदिया जिल्ह्यातील तीन प्रवाशांचा समावेश आहे. पोलिस विभागात कार्यरत स्मिता सूर्यवंशी यांच्यावर मोरगाव अर्जुनी येथे पोलिस विभागाच्यावतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.