पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

मुंबई, दि. ०५ : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ही बैठक एचएसबीएस, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीला प्रधान सचिव संजय खंदारे,  संचालक ई. रवींद्रन, सहसचिव बी. जी. पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग तसेच मुख्य अभियंता व विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या, ग्रामीण व शहरी भागातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थापन अधिक दर्जेदार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. राज्यात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी नवीन धोरणांवर विचारविनिमय करण्यात आला. याबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीसाठीच्या उपाययोजना करण्यावर भर देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

पावसाळ्यात अधिक पाणी साठवण करण्यासाठी जलसंधारण प्रकल्पांचे नियोजन करण्यात यावे. गावागावांत रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लागू करण्याचा यावे, पाणी टंचाईग्रस्त भागांसाठी तातडीच्या उपाययोजना ज्या भागांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न उद्भवतो, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विहिरी खोदणे, जलस्त्रोत वाढवणे यासारख्या उपाययोजना हाती घेण्याचे यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ग्रामस्तरावरील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन व अंमलबजावणी, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच पाणी पुरवठा योजनेची प्रगती आणि उर्वरित गावांमध्ये जलवाहिन्या पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

Source link

Comments (0)
Add Comment