सासवड इफ्तार हल्ला प्रकरणी आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी

तेज पोलीस टाइम्स : परवेज शैख

दिनांक: १६ मार्च २०२६सासवड येथील भिवरी गावात घडलेल्या इफ्तार हल्ला प्रकरणी आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा (Attempt to Murder) गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यासाठी अॅड. तोसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक (SP) संदीप गिल यांची भेट घेतली.दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता, भिवरी गावात इफ्तार करत असलेल्या सुमारे १४ मुस्लिम युवकांवर जमावाने हल्ला करून त्यांना मारहाण केली, ज्यामध्ये काही युवक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०३/२०२६ नोंदविण्यात आला असून त्यामध्ये कलम 118(1), 189(2), 190, 191(2)(3), 351(2)(3), 352 तसेच आर्म्स अॅक्ट कलम 4/25 आणि बॉम्बे पोलीस अॅक्ट कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र या प्रकरणात खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) संबंधित कलम 109 लावण्यात आलेले नाही, अशी बाब प्रतिनिधीमंडळाने निदर्शनास आणून दिली. तसेच ७२ तास उलटूनही कोणत्याही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, उलट काही संशयितांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले, असेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे पीडितांनी काही आरोपींची ओळख पटवून दिल्यानंतरही त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही.या पार्श्वभूमीवर प्रतिनिधीमंडळाने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली. या वेळी मारहाणीत जखमी झालेले पीडित आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.या प्रतिनिधीमंडळात अॅड. सुरज जाधव, प्रशांत जगताप, मोहसिन शेख, अनीस सुंडके, अॅड. क्रांती शाने, स्वाती गायकवाड, राहुल धांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. तसेच जर सासवड पोलीसांकडून आरोपींना मदत केली जात असल्याचे किंवा कायद्याविरुद्ध काम केले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.अॅड. तोसिफ शेख यांनी सांगितले की हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय आहे. घटनास्थळापासून फक्त १०० ते २०० मीटर अंतरावर पोलीस चौकी असताना २०० ते २५० लोकांचा जमाव कसा जमला, तसेच पोलीस गुप्तचर यंत्रणा काय करत होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गंभीर स्वरूपाच्या जखमा असूनही सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचे कलम का लावले गेले नाही, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.अ‍ॅड तोसिफ शेख ९८६०९०७३५७

Comments (0)
Add Comment