मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणातून पाणी वाहिले, अशा शब्दांत डिवचले. त्यावर संतापलेल्या अमोल मिटकरी यांनी राज यांच्यावर तोफ डागली होती. राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा करीत टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबाजांनी अजित पवारांवर बोलू नये, असा पलटवार केला होता. मिटकरी यांच्या टीकेनंतर मनसैनिक कमालीचे आक्रमक झाले.
मनसैनिकांच्या संतापाचा पारा चढला, मिटकरींची गाडी फोडली!
शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्याकरिता अमोल मिटकरी मंगळवारी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर आले होते. त्यावेळी मनसैनिकांनी त्यांच्या गाडीला लक्ष्य केले. मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडून राज ठाकरे यांच्यावरील टीकेचा संताप मनसैनिकांनी व्यक्त केला. या हल्ल्यात मिटकरी यांच्या गाडीचे बरेच नुकसान झाले.
मागून हल्ला करणारे मर्द नसतात. आमच्याही कार्यकर्त्यांनी मनसैनिकांना सडेतोड उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात काय मोगलाई लागली आहे काय? हल्ल्यासंदर्भात अकोला पोलीस अधिक्षकांशी माझे बोलणे झाले असून तत्काळ कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.
मी केलेल्या टीकेवर मनसैनिकांचा आक्षेप असेल तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी पण टीका रुचली नाही म्हणून थेट गाडीवर हल्ला करणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? असा सवालही मिटकरी यांनी विचारला.
अमोल मिटकरी राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील सुपारीबहाद्दर नेते आहेत. टोलनाक्याचे आंदोलन असो वा भोंद्याचे आंदोलन असो, अशी त्यांची अनेक आंदोलने फसलेली आहेत. राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता येत नाही, त्यांनी काय पूरस्थितीबद्दल बोलावे? राज ठाकरेंची विश्वासार्हता संपलेली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवार यांच्यावर बोलू नये, अशा शब्दात राज ठाकरे यांच्यावर मिटकरी यांनी टीका केली होती.