लाखोंचा जनसमुदाय जमा होणार; गैरसोय नको त्यामुळे सुट्टीचा आदेश जाहीर
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान लाखो मराठा बांधव एकत्रित जमा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली काढून सभा होणार आहे. सरस्वती चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जरांगे पाटील अभिवादन करायला जाणार आहेत. संभाजी महाराज चौका पासून ते आंबेडकर चौक या मार्गावर मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.
रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होवून वाहतुकीची कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ७ ऑगस्टला सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅलसंबंधाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्वच वाहनांसाठी बंद ठेवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी शहरातील शाळांच्या सुटीचा आदेश काढला आहे.
लाखो मराठा बांधव जमा होतील; ठळक बाबी
शांतता रॅलीसाठी सोलापूर शहर-जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक येण्याची शक्यता आहे. सोलापूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना अडचणी येवू शकतात. शहरातील सरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांना 7 ऑगस्ट रोजी सुटी राहील.विद्यार्थ्यांना शाळेला सुटी असेल, पण शाळा, संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून काम करायचे आहे, असेही आदेशात नमूद आहे.