राज ठाकरे म्हणाले, आज प्रशासनाचा धाक गुन्हेगारांवर राहिलेला नाही. त्यामुळेच पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि महाराष्ट्रातील बदलापूरसारख्या घटना घडताना दिसतात. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. निगरगट्ट प्रशासनामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. येथील शासनाला याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही, असे दिसते आहे. एक एसआयटी नेमून दिली, जलदगती न्यायालयात प्रकरण दाखल केले की झाले मोकळे, अशाप्रकारे शासन व्यवस्था चालते काय? आज महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका करून ठेवला आहे. एका-एका आमदारांवर ५० खोके घेऊन स्वतःला विकल्या गेल्याचे आरोप होत आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात हे कधीही ऐकायला मिळत नव्हते, असेही राज म्हणाले.
मनसेचे विचार गोंदिया जिल्ह्यातील गावोगावी, घराघरापर्यंत पोहोचविण्याकरिता प्रत्येक मनसैनिकांना आजपासूनच सज्ज व्हावे लागणार आहे. पुढील १५ नोव्हेंबरपर्यंत निवडणुका अपेक्षित असल्यामुळे वेळ कमी उरला आहे. या कमी वेळातच अधिक गतीने प्रत्येक मनसैनिकाला धाव घ्यावी लागणार. आपण पुढील दोन महिन्यांत केलेल्या कर्तबगारीमुळे यशापर्यंत पोहोचलो नाही तरी जवळपास पोहोचू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.