‘तू आमच्यामध्ये येऊ नकोस, नाही तर तुला सोडणार नाही’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०१६ मध्ये भाग्यश्री आणि सोपान या दोघांचे लग्न झाले होते. हे कुटुंब मुळचे नांदेड येथील असून सध्या ते वाघोली परिसरातील विठ्ठलवाडी भागात राहत होते. त्यानंतर काही दिवसात भाग्यश्री आणि मधुकर केंद्रे यांच्यात विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. याची माहिती भाग्यश्रीचे पती सोपान यांना समजली. त्यानंतर सोपान यांनी पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, पत्नी पतीच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. भाग्यश्री आणि तिचा प्रियकर असलेला मधुकर हा भाग्यश्रीच्या पतीला वारंवार धमक्या देखील देत असल्याचे समोर आले आहे. ‘तू भाग्यश्रीला सोडून दे. मी तिला सांभाळतो. तू आमच्यामध्ये येऊ नकोस. नाही तर तुला सोडणार नाही’, अशी धमकी त्याने सोपान यांना दिली होती.
सोपान केंद्रे यांनी या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचे नोंद देखील केली करण्यात आला आहे. मात्र, सोपान यांनी आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.