Maharashtra Politics: शिर्डी मतदारसंघात जाती-धर्मावरून द्वेष पसरवला दर माझ्याशी गाठ आहे अशा शब्दात माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता भडक भाषणाला विरोध केला.
डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम राहिले पाहिजे. तीस वर्षांत आम्ही कधीही जात विचारली नाही. मात्र, हल्ली जातीचे विष पसरवणारे लोक जनतेला आता नको झाले आहे. शिर्डी मतदारसंघात जाती-धर्मावरून द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे,’ असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी दोन दिवसांपूर्वी नगर आणि श्रीरामपूरला येऊन गेलेले भाजचे आमदार नितेश राणे यांच्याकडे त्यांचा रोख असल्याचे सांगितले जाते.
शिर्डीत आयोजित एका कार्यक्रमात विखे बोलत होते. ते म्हणाले. ‘याच शिर्डीमध्ये साईबाबांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आणि तो संदेश आपल्याला भविष्यात देशभराला द्यायचा आहे. सध्या जनतेच्या गरजा महत्त्वाच्या आहेत. तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, हे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे नाही,’ असेही विखे म्हणाले.
Sujay Vikhe: राणे नगरला आले, बोलून गेले; विखे पाटील म्हणाले… वातावरण कोणी बिघडविले तर माझ्याशी गाठ
महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे नगर आणि श्रीरामपूरमध्ये आमदार राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हाही राणे यांच्याविरूद्ध दाखल झाला आहे. त्यामुळे विखे पाटील यांचा इशारा राणे यांनाच उद्देशून असल्याचे बोलले जात आहे.