‘कुस्तीपटूंना फक्त एकच जात असते, ती म्हणजे पैलवान. तालमीत जाऊन व्यायाम करताना, सर्व धर्माचे पैलवान हे बजरंग बलीच्या पाया पडून व्यायाम सुरू करतात किंवा कुस्तीचा सराव करतात. मी देखील १० वर्ष सतत कुस्त्या जिंकल्या. मात्र जातीचं राजकारण कुठंही झालं नाही. मी सिकंदरला फोनवरून संपर्क केला आणि त्याची समजूत काढली. तसंच हार मान्य करत नव्या जोमाने तयारीला लाग आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरून अंतिम सामन्यात गदा जिंकून दाखव,’ असा सल्ला दिला असल्याची माहिती अस्लम काझी यांनी दिली.
पंचांच्या वादग्रस्त निर्णयावरही अस्लम काझी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात जो उपांत्य फेरीत सामना झाला, त्यामध्ये काही दोष आहे. बाहेरची टांग या डावात सिकंदरला १ गुण व महेंद्रला २ गुण मिळणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. व्हिडिओ पाहिल्यावर ते दिसून येतं. मात्र ही अनावधानाने झालेली चूक आहे. मुस्लिम आहे म्हणून सिकंदरला हरवलं गेलं, असं म्हणणं चुकीचं आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जातीय आधार घेतला जात नाही,’ असं काझी यांनी म्हटलं आहे.